शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

सोनेरी दिवस


(सुरुवातीला इंग्रजी मुळाक्षरांच्या सहाय्याने मराठीत लिहिलेल्या लेखाविषयी मिळालेल्या प्रतिक्रियांनातर, आमच्या मित्रमंडळाच्या आग्रहास्तव देवनागरीमध्ये केलेला हा लेखप्रपंच.)
खरं तर रानडेत पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्या दिवसापासून माझं जग बदललं. किंबहुना मला ओळखणाऱ्या सगळ्यांना त्यावेळी मीच बदललो असही वाटायला लागलं. काही खास माणसं सोडली तर बाकी सगळ्यांच हेच मत होतं. काही म्हणायचे चला योगेश सुधारला आता... तेव्हा माझा मी स्वतःलाच प्रश्न विचारायचो, मी बिघडलो होतो केव्हा की हे माझ्याविषयी असा विचार करतायेत... या प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडलेली नाहीत. 
हळू-हळू सगळंच स्थिरस्थावर होतंय. सगळ्यांचं माझ्याविषयीचं मत पुन्हा बदलायला सुरुवात झालये. कदाचित बदल हाच जगाचा खरा नियम आहे हे कोणाचं वाक्य आहे ते नाही माहिती, ते मलाही लागू पडतंय असंच भासतंय प्रत्येकवेळी. बदल होतंच चाललेत. मीही बदलतोय आणि माझ्या आजूबाजूचेही. आता महाराष्ट्र टाइम्सला आल्यापासूनतर कमावता झालोय म्हटल्यावर हे अजूनच वाढलंय. एखाद्यासाठी पूर्वी माझ्याकडे असणारी वेळ माझ्याकडे नाही हे त्यांना सांगणं मला स्वतःला जड होतं, तसं त्यांना सांगूही वाटत नाही, तरी ते सांगणं ही माझी अपरिहार्यता बनलीये. पण समोरची माणसं विचार करतात, हा आता जास्तच शहाणा झालाय, जास्तच भारी भरायला लागलाय. कोणाला कसं पटवून सांगावं हेही समजत नाही. हे मात्र नक्की, की जग दोन्ही बाजूजी बोंबलतं (जरा जास्तच वाइट शब्द वापरला मी इथं, पण तोच चपखल बसतोय,).
भुसावळमध्ये होतो, त्यावेळचे काही दिवस आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही. वाईट दिवस होते ते म्हणून, पण आता सध्या पुण्यात जे दिवस पाहातोय, त्याचा विचार करता हे दिवस नक्कीच सोनेरी दिवस आहेत माझ्या आयुष्यातले असंच म्हणेन मी. खरं तर इथला प्रत्येक दिवस मला मी कोणे एके काळी पाहिलेल्या स्वप्नांची आठवण करून देतोय. बी.एस्सी. सुरू होतं तेव्हा विचार करायचो की केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स करायचं तर पुणे विद्यापीठातूनच. नंतर विचार बदलला. पण पुण्यात येऊन शिकण्याचाय विचार कायम होता. मधल्या काळात मी पुढे शिकेन, काही करेन याविषयी कोणालाही विश्वास वाटत नव्हता. जवळचे दोघं-चौघ मित्र सोडले, तर त्यावेळी प्रत्येकानेच झिडकारलं. कदाचित त्यांनाही वाटलं असेल मनातल्या मनात तसं, पण मैत्रिचं नातं कदाचित विसरले नसावेत ते. त्यामुळे सहन केलं त्यांनी मला. नंतर काही दिवसांनी जेव्हा पुण्यात प्रवेश मिळाल्याचं समजलं सगळ्यांना तेव्हा, चला सुटतो असाही विचार केला असेल काहींनी...
सुधारलो त्यावेळी. कदाचित पुन्हा एकदा बिघडण्यासाठी असेल हे सुधारणं, पण आता मागचे एक वर्ष आणि हे सध्याचे दिवस जेव्हा निवांतपणामध्ये बसून अनुभवतोय, तेव्हा एकच लक्षात येतंय, बेटा योग्या जी स्वप्न पाहिली होतीस, तीच जगतोयेस... असंही होऊ शकतं... निवांतपणा कदाचित आत्मपरीक्षण करण्यासाठीच मिळत असावा... भारी वाटतं हे सगळं आठवताना. अन सहजच मनात येतं यार आपण जे जगतोय सध्या त्यालाच सोनेरी दिवस म्हणत असावेत. कदाचित हाच काळ माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला खास काळ असावा. या काळात माझ्याशी नव्याने जोडल्या गेलेल्यांना, जूने लोक जे अजूनही जोडलेले आहेत, त्यांच्यामुळेच अजूनही तसाच आहे, त्या सगळ्यांनाच या माझ्या सोनेरी दिवसांचे श्रेय.