रविवार, २२ मे, २०११

दिल तो बच्चा है जी...

दिल तो बच्चा है जी... हे गाणं बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय. त्यावेळी गाणं ऐकायच्या धुंदीत कदाचित त्या गाण्यातल्या शब्दांकडे लक्ष दिलं नव्हतं. परवा अचानक लक्षात आलं, मास्टर्स झालो. दुर्दैवानी औपचारिक शिक्षण संपलं. तितक्याच सुदैवानी अनौपचारिक शिक्षण सुरू झालं हे नशिब! तर म्हणत होतो, की शिक्षण संपलं. हा एक अध्याय पूर्ण केला की आपल्याकडे ‘माणूस मोठा झाला’ असं म्हणायची पद्धत आहे. माणसं मोठी होतात, पण मला स्वतःला मी वयाने खूप मोठा झालोय असं वाटतच नाही अजून.

अजूनही ते लहाणपणीचे दिवस आठवतायेत. चिखलाच्या गाड्या बनवत फिरणारा, क्रिकेटसाठी थोडा तडफडणारा, शाळा सुटली की रोजच्या नियमाने पाच ते साडे सहाच्या दरम्यान नियमितपणे खेळणं, नंतर अभ्यास वगैरे वगैरे करणारा मी... तसे बरेच काही पराक्रम केले, पण आता ते जेव्हा आठवतात तेव्हा पुन्हा वाटतं की, अजूनही लहानपण गेलेलं नाही आपलं. अजूनही तश्याच करामती कराव्याशा वाटतात. करता येत नाहीत, हा भाग वेगळा. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्या गाण्याचे शब्द किती खरे आहेत, आपल्यासाठी कसे लागू आहेत ते समजतं. अजूनही मी लहान असल्याचं भासतं. मोठे म्हणतात, हो लहानच आहात तुम्ही, पण म्हणून काय लहानांसारखं वागायचं का. त्यावेळी जबाबदारीची जाणीव होते, पण सांगावं वाटतं खरचं अजून लहानच आहोत.

लहानपण किती भारी असतं, हे आता मोठं झाल्यावर लक्षात येतं हे दुर्दैव म्हणेन मी. कदाचित प्रत्येकालाच वाटत असावं असं. म्हणूनच तर ती गाणी लिहिली जात असावीत. ‘दुसऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं, हा जणू काही आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे’ अस मानून जगणारे प्रत्येकवेळी लहानांसारखं जगणाऱ्यांना त्रास देतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही लहानांसारखे वागतो ठिक आहे, पण बालिश तर नक्कीच नाही ना, मग असं का वाटतं हाही एक गंभीर प्रश्न आहे. कोणीतरी म्हटलयं बहुतेक, की प्रत्येकात एक खट्याळ मूल दडलेलं असतं... असं असेल तर मग त्या मुलाचा साक्षात्कार होतो कधी-कधी. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे सांगतात, तर मग असा साक्षात्कार झालेली मुलं ‘बावळट’ कशी ठरतात.

मोठं झाल्यावर लहानांसारखं वागण्याचं समर्थन नाही करत मी, पण आपण हे का विसरतो की असं जगण्यातही एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी मजा येते. लहान मुलं खेळताना पाहिली की किती आनंद होतो, तसंच खेळावसं वाटतं. पण प्रयत्न केला की बास, झालंच. थोडं वाईट वाटतं, पण कोणीच ही बाब समजून घेत नाही. ही अडचण फक्त माझीच होते असं नसावं कदाचित. प्रत्येकालाच हा अनुभव एकदातरी आला असावा. जर वाटतं तर व्हावं लहान, थोड्या वेळासाठी. घ्यावा तोही आनंद. पुन्हा व्हावं मोठं. पण मोठं झाल्यावर जर पुन्हा आपली तिच लहाणपणाची छबी इतर आपल्याला आपला बावळटपणा म्हणून सांगत असतील, तर तसं न करणं अन आपलं मन मारणं ठिक आहे असंच वाटतं ना?

अवघड जागेचं दुखणं म्हणतात ते असं. बाकी काही नाही. ही पोस्ट म्हणजे बालिशपणा नाही, मोठा झालोय याचं वाईटही वाटत नाही, पण लहानपण उपभोगता येत नाही याचंच जास्त दुःख होतंय म्हणून लिहिलिये. बाकी काही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा