बुधवार, २० जुलै, २०११

वारी अनुभवताना...

चंगळ खाण्याची, वारकर्‍यांची...
(महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)

पुणं सोडल्यापासून आजूबाजूचा परीसर मस्तच वाटतोय. नुकत्याच झालेल्या पावसाने सगळीकडे हिरवळ पसरली आहे. एरवी बोडके वाटणारे डोंगरही हिरवे दिसायला लागले आहेत. चालताना आजूबाजूच्या शेतांकडे हलकेच नजर टाकली तर बहुतांश ठिकाणी नांगरट केलेली दिसतेय. काही ठिकाणी तर पहिल्या वाफश्यासाठी ढेकळं अगदी आसूसलेलीच आहेत, असं भासलं. कारण ही ढेकळं त्यांच्यावर थोडं पाणी जरी पडलं तरी शोषुन घेत अजून कुणी पाणी टाकतंय का, अशी वाटच बघतायेत. अर्थात ती वाट बघतायेत पावसाचीच, अन नेहमीप्रमाणे वारीसोबत तो येणार हेही त्यांना ठाऊक असावं!

अशा वातावरणात वारीसोबत चालताना पावसाच्या हलक्या सरींमुळे येणारा मृद्गंध आणि त्यासोबतच चुलीवर केलेल्या भाकरी वा चपातीचा घमघमाट नाकात गेल्यावर अंगावर शहारा आल्यावाचून अन् ती चव आठवत तोंडाला पाणी सुटल्यावाचून नक्कीच रहावणार नाही. हं, ज्यांना ही चवचं माहिती नाही त्यांची गोष्ट वेगळी, पण वारकर्‍यांचं काय? त्यांच्यासाठी हा मृद्गंध आणि तो घमघमाट विसावा घ्यायला मजबूर करतोय. दुपारच्या विश्रांतीसाठी थांबायच्या अगोदर असा ‘टेम्प्टींग स्मेल’ त्यांना ही भूकेची वेळ आहे, असं सुचवत असावा. पालखीच्या तळाच्या आजूबाजूला अनेक दिंड्यांच्या भोवताली असे अनेक टेम्प्टींग स्मेल सध्या दरवळत आहेत.

तसं शहरांमधून आलेल्या थोड्या स्टँडर्ड वारकर्‍यांइतकं दुसरं कुणी वारीमध्ये खाण्या-पिण्याची काळजी करताना पाहिलं नाही. पण एक गोष्ट नक्कीच ऑबसर्व्ह केली, खाण्याच्या बाबतीत वारीत अगदी चंगळच असते. आणि असं कोणी सांगितलं तरी ते वावगं ठरू नये इतक्या प्रकारचे निरनिराळे पदार्थ आणि निरनिराळ्या चवी आपण वारीमध्ये चाखू शकतो. आत्तापर्यंत किती प्रकारच्या चटण्या, लोणची अन् किती प्रकारच्या दशम्यांची चव चाखली हे निश्‍चित सांगता येत नाही; पण जितक्या ठिकाणांहुन अन् गावांहून लोकं वारीसाठी आली असणार, त्या-त्या ठिकाणची चवं ती लोकं वारीमध्ये घेऊन आली आहेत.

विशेष उल्लेख करुन सांगावं असं काही म्हणाल तर सुधारस! पहिलांदाच चाखला. लिंबाचा रस, साखरेचा पाक, त्यात बेदाणे, वेलची अन् डाळींबाचे दाणे...काय चवं होती यार...आपल्याकडच्या सीसीडीमध्ये असे काही पदार्थ असतील तर बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे बघायलाही होणार नाही. बेसण, खिचडी, लसणी-खोबर्‍याची चटणी, धपाटे, उसळी, मिठायांची तर खैरातच आहे. खाऊन-खाऊन थकायला होणार. आता आठवडा होत आलाय, पण एकही पदार्थ रिपिट नाही, इतकी वैविद्यता खाण्यामध्ये आहे इथं. अर्थात पुढचा प्रवास चालत करायचा हे लक्षात घेत वारकरी भूकेला एक घास कमी म्हणत शिस्तीत जेवतात. इतर कोणत्या पंगतीच्या ठिकाणी असं बघायला मिळणार नाही. वारी अशा अनेक अनुभवांनी आपल्याला समृध्द बनवणार आहे, हा विचारच सुखावह आहे, अन् खाण्याचे इतके पदार्थ असताना भूक मरणार की जगणार हा ज्याच्या त्याचा प्रश्‍न आहे. वारीतला हा अनुभव वारकर्‍यांसाठी लिमिटेड आहे, इतरांसाठी नियम- अटी लागू.
....................

योगेश बोराटे
30/6/2011
..............

२ टिप्पण्या: