बुधवार, २० जुलै, २०११

वारी अनुभवताना...

वारीतले वॉटरप्रुफिंग एक्सपर्ट...
(महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)
परवा दिवेघाटात पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी, आळंदीपासून अगदी पुणे ओलांडेपर्यंत पांढरा कुर्ता आणि धोतर या ‘वारकरी स्पेशल’ गणवेशात चालणारे सगळे वारकरी अचानक रंगबेरंगी प्लॅस्टिकच्या कागदांमध्ये स्वत:ला गुंडाळत पुढे निघाले होते. घाटमाथ्यावरून हे चित्र मस्तच वाटलं. आपल्याकडच्या रेनकोटच्या तुलनेत कितीतरी विविधता होती त्यात. पुढे इकडे लोणंदमध्ये पोचेपर्यंत रस्त्याच्या कडेने तसले प्लॅस्टिकचे कागद, वारकर्‍यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर कचकड्याचे कागद विकणारे अनेक विक्रेते पाहिले.

हे झालं दिवसभर चालतानाचं, रात्रभरं रहायची सोयही काहीशी अशीच आहे.पालखी तळावर शेकडो तंबू उभारलेले दिसतात. काही तंबू खास वॉटरप्रुफ ताडपद्रीचे आहेत. काही आहेत मेणकापडाचे तर काही ठिकाणी कापडी तंबूला प्लॅस्टिकचं प्रोटेक्शन आहे. पावसापासून संरक्षणासाठीची ही तरतूद आहे.पण फक्त चालताना आणि झोपताना आपल्या प्रोटेक्शनचा विचार करतील ते वारकरी कसले. टाळेसाठी वॉटरप्रुफिंगची गरज नाही; पण वीणा आणि मृदुंगासाठी अशी वॉटरप्रुफींगची ट्रिटमेंट दिलेली वारीत पहायला मिळाली.

लोणंदच्या मुक्कामासाठी पालखी थांबलेली असताना कोपरखैरण्यावरून आलेल्या दिंडीमध्ये चक्कर मारायला गेलो. दिंडी नेहमीसारखीच होती, वेगळं काही नव्हतं पण विणेकर्‍याकडची विणा वेगळी वाटली. अगोदर चकाकते म्हणून लक्ष गेलं, पण नंतर जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ती पूर्ण प्लॅस्टिकच्या कागदात होती. तरीही नीट वाजत होती हे विशेष! विणेकर्‍याचं नाव आहे बबन नाईक, दिंडी क्रमांक ६०, कळवा-बेलापूर विभाग, ठाणे. असं का केलयं विचारल्यावर नाईक म्हणाले, पावसापासून बचाव होतो, विणा अजिबातही खराब होत नाही. गर्दीपासूनही विणा सुरक्षित ठेवता येते. अन विणा सारखी सोबत घेऊन हिंडावं लागतं. आपण भिजलो तरी जमतं, विणेचं लाकूड खराब झालं की सूर लागत नाही. अभंग- गाणी म्हणायला विणेचा आणि मृदुंगाचा सूर द्यावा लागतो. विणा भिजली की तो सूर कसा मिळायचा? म्हणून मग आपलं आसं कागदात ठेवलंलं परवडतं.

पावसात आपण शक्यतो एक गंम्मत म्हणून भिजतो, पाऊस वाढला की एकतर आडोश्याला नाहीतर रेनकोटसह. वारकर्‍यांच तसं नाही. पाऊस आला तरी चालणं सोडायचं नाही. अगदी नाईलाज झाला तरच थांबायचं. नाहीतर जेव्ह्डं जमेल तेवढं असंच वॉटरप्रुफ करायचं की झालं.यालाच आपल्याकडे ऍडजस्टमेंट म्ह्णतात, वारकरी म्हणतात सेवा!
....
योगेश बोराटे
2/7/2011
.......

वारी अनुभवताना...

चंगळ खाण्याची, वारकर्‍यांची...
(महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)

पुणं सोडल्यापासून आजूबाजूचा परीसर मस्तच वाटतोय. नुकत्याच झालेल्या पावसाने सगळीकडे हिरवळ पसरली आहे. एरवी बोडके वाटणारे डोंगरही हिरवे दिसायला लागले आहेत. चालताना आजूबाजूच्या शेतांकडे हलकेच नजर टाकली तर बहुतांश ठिकाणी नांगरट केलेली दिसतेय. काही ठिकाणी तर पहिल्या वाफश्यासाठी ढेकळं अगदी आसूसलेलीच आहेत, असं भासलं. कारण ही ढेकळं त्यांच्यावर थोडं पाणी जरी पडलं तरी शोषुन घेत अजून कुणी पाणी टाकतंय का, अशी वाटच बघतायेत. अर्थात ती वाट बघतायेत पावसाचीच, अन नेहमीप्रमाणे वारीसोबत तो येणार हेही त्यांना ठाऊक असावं!

अशा वातावरणात वारीसोबत चालताना पावसाच्या हलक्या सरींमुळे येणारा मृद्गंध आणि त्यासोबतच चुलीवर केलेल्या भाकरी वा चपातीचा घमघमाट नाकात गेल्यावर अंगावर शहारा आल्यावाचून अन् ती चव आठवत तोंडाला पाणी सुटल्यावाचून नक्कीच रहावणार नाही. हं, ज्यांना ही चवचं माहिती नाही त्यांची गोष्ट वेगळी, पण वारकर्‍यांचं काय? त्यांच्यासाठी हा मृद्गंध आणि तो घमघमाट विसावा घ्यायला मजबूर करतोय. दुपारच्या विश्रांतीसाठी थांबायच्या अगोदर असा ‘टेम्प्टींग स्मेल’ त्यांना ही भूकेची वेळ आहे, असं सुचवत असावा. पालखीच्या तळाच्या आजूबाजूला अनेक दिंड्यांच्या भोवताली असे अनेक टेम्प्टींग स्मेल सध्या दरवळत आहेत.

तसं शहरांमधून आलेल्या थोड्या स्टँडर्ड वारकर्‍यांइतकं दुसरं कुणी वारीमध्ये खाण्या-पिण्याची काळजी करताना पाहिलं नाही. पण एक गोष्ट नक्कीच ऑबसर्व्ह केली, खाण्याच्या बाबतीत वारीत अगदी चंगळच असते. आणि असं कोणी सांगितलं तरी ते वावगं ठरू नये इतक्या प्रकारचे निरनिराळे पदार्थ आणि निरनिराळ्या चवी आपण वारीमध्ये चाखू शकतो. आत्तापर्यंत किती प्रकारच्या चटण्या, लोणची अन् किती प्रकारच्या दशम्यांची चव चाखली हे निश्‍चित सांगता येत नाही; पण जितक्या ठिकाणांहुन अन् गावांहून लोकं वारीसाठी आली असणार, त्या-त्या ठिकाणची चवं ती लोकं वारीमध्ये घेऊन आली आहेत.

विशेष उल्लेख करुन सांगावं असं काही म्हणाल तर सुधारस! पहिलांदाच चाखला. लिंबाचा रस, साखरेचा पाक, त्यात बेदाणे, वेलची अन् डाळींबाचे दाणे...काय चवं होती यार...आपल्याकडच्या सीसीडीमध्ये असे काही पदार्थ असतील तर बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे बघायलाही होणार नाही. बेसण, खिचडी, लसणी-खोबर्‍याची चटणी, धपाटे, उसळी, मिठायांची तर खैरातच आहे. खाऊन-खाऊन थकायला होणार. आता आठवडा होत आलाय, पण एकही पदार्थ रिपिट नाही, इतकी वैविद्यता खाण्यामध्ये आहे इथं. अर्थात पुढचा प्रवास चालत करायचा हे लक्षात घेत वारकरी भूकेला एक घास कमी म्हणत शिस्तीत जेवतात. इतर कोणत्या पंगतीच्या ठिकाणी असं बघायला मिळणार नाही. वारी अशा अनेक अनुभवांनी आपल्याला समृध्द बनवणार आहे, हा विचारच सुखावह आहे, अन् खाण्याचे इतके पदार्थ असताना भूक मरणार की जगणार हा ज्याच्या त्याचा प्रश्‍न आहे. वारीतला हा अनुभव वारकर्‍यांसाठी लिमिटेड आहे, इतरांसाठी नियम- अटी लागू.
....................

योगेश बोराटे
30/6/2011
..............