शनिवार, २६ जानेवारी, २०१३

तू जाने ना...

प्रजासत्ताक दिनामुळे नेहमीच्या कामातून थोडा निवांतपणा अनुभवत होतो. घरी असल्यामुळे सहजच टीव्हीसमोर आलो होतो. भावाला टीव्ही सुरू करायला सांगून आत गेलो. परत बाहेर येईपर्यंत त्याने मराठी न्यूज चॅनल सुरू केलं होतं. समोर तीन महिला एका व्यक्तीची मुलाखत घेत होत्या. मराठी चॅनल असल्यामुळे प्रश्न मराठीत विचारले जात होते, पण उत्तरं मात्र हिंदीतूनच दिली जात होती. त्या व्यक्तीचा आवाज ओळखीचा वाटल्यानं चटकन टीव्हीकडे पाहिलं. ती कैलाश खेरची मुलाखत होती. ते पाहाता पाहाताच वर्षभरापूर्वीचा त्याच्या पुणे भेटीतला पत्रकार संघातला वार्तालाप आठवला. सहजच मनात आलं, हा भन्नाट अवलियाच आहे, मराठी चॅनल असलं आणि मराठीत प्रश्न विचारणारी मंडळी समोर असली, तरी हा पठ्ठा हिंदीतूनच उत्तरं देणार आणि गाणीही हिंदीच म्हणणार. हसायला आलं. मुलाखत तशीच पाहात राहिलो. त्याची पुण्यातली मुलाखतही आठवत राहिलो. 
 
तो पत्रकार संघामध्ये येणार म्हटल्यावर काम नसतानाही, मी तो माणूस म्हणून नेमका कसा आहे हे अनुभवायला पत्रकार संघामध्ये गेलो होतो. तिकडे गेल्यावर कैलास बाबांनीही माझी निराशा नाही केली. मला त्या वेळी त्याच्याकडून एखाद दुसरं गाणं ऐकण्यापेक्षा तो नेमका कसा आहे, गाणं कसं शिकला, त्याच्या गाण्यात नेहमी असणारं गिटार आणि त्याच्या विशिष्ट पट्टीतल्या गाण्यामागची कारणं काय, त्याच्या आवाजामध्ये असणारं ते वेगळं दर्द तसंच का आहे, अशा अनेक गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटत होत्या. तसेच नानाविध प्रश्न माझ्या डोक्यात त्या वेळी होते. संधी मिळाली, की ते प्रश्न विचारायचे असं ठरवूनच मी तिकडे गेलो होतो. पण कोणाला काहीही विचारायची जास्त संधी न देता अगदी मनमोकळ्या गप्पा मारत कैलास खेर नेमका कसा, हे त्याने स्वतःच सांगितलं. ते सांगता सांगता तो कलाकार किंवा गायक असण्यापेक्षा तो मला एक फिलॉसॉफरच वाटला. म्हणूनच त्याला नुसता कैलाश खेर म्हणण्यापेक्षा कैलास बाबाचं म्हणणं जास्त योग्य वाटलं आणि ही मुलाखत पाहातानाही अजून तसंच वाटतंय. 

त्यानी सांगितल्यानुसार त्याचा जन्म मेरठमधला. तो म्हणाला की त्याला दुःख आणि परिस्थितीनेच मोठं केलं. त्यामुळे त्या दुःखाला आणि परिस्थितीलाच तो आपला पिता मानतो. त्याने संगीतासाठी तेराव्या वर्षीच घर सोडलं. कोणीतरी त्याला संगीत शिकण्यासाठी दिल्लीतल्या गंधर्व महाविद्यालयाचा पत्ता सांगितला होता. त्यानंतर घरच्यांच्या परवानगीची वाट न पाहता तो तिकडं जायचं म्हणून बाहेर पडला. नंतर मधल्या काळात नोकरी केली. तो म्हणतो, नौकरी के नौ काम, दसवा काम, हाँ जी. ते न पटल्यानं पुढे धंदा सुरू केला. पण धंद्यात खोटं बोलावं लागतं, ते आपल्या स्वभावातच नसल्याचं लक्षात आल्यावर त्यातूनही तो बाहेर आला. पुन्हा जीवनात धडपडणं नशिबी आलं. पण ती धडपड संगीतासाठी करावी लागली नाही. ते आपसूकच येत गेल्याचं तो मानतो. परिस्थितीच त्याला ते शिकवत होती. वडील पंडित होते, म्हणून त्याने ते काम शिकण्याचाही प्रयत्न करून पाहिला. त्यासाठी हृषिकेशला जाऊन राहिल्यावरही समाधान न झाल्याने शेवटी त्याने मुंबई गाठली. 

दरम्यानच्या काळात आत्महत्येचा विचार अनेकदा डोक्यात येऊन गेल्याचे त्याने कबूल केलं. पण प्रत्येकवेळी त्यातून बाहेर येण्यासाठी शिवबाबानी आपल्याला तारल्याचं तो सांगतो. त्याच्या अशा वाक्यांमधून त्याच्या भक्तीविषयी आपोआपच अप्रूप वाटायला लागलं होतं. अशा भक्तीमुळेच सुफी संगीताचाही आपल्यावरचा पगडा वाढल्याचं त्यानं सांगितलं. इंडस्ट्रीमध्ये आल्यावर जिंगल्सपासून सुरुवात केली. त्यानंतर अल्लाह के बंदे. त्यानंतर कैलासा. मुंबईतल्या परेश आणि नरेश कामथसोबत काम. असं सगळं त्याने एका झटक्यात सांगून टाकलं. गाणी लिहिण्याचं प्रशिक्षण घेण्याची गरजच पडली नाही इतकं त्याला दुःखानेच शिकवल्याचं तो सांगतो. आप्पे ही गुरू आप्पे ही चेला हे त्याचं असंच एक भन्नाट तत्वज्ञान. अनुभवामधूनच आपण शिकतो, असा त्याचा मतितार्थ. त्याचं संगीत म्हणजे एक केस स्टडी असल्याचं तो मानतो. त्याविषयीचं संशोधन सतत सुरूच असल्याचं त्यानं सांगितलं. आपण हिंदीत बोलत असलो, तरी हिंदीत लिहित नाही, हेही त्याने हसत हसत सांगितलं.

कोणाला फॉलो करण्यापेक्षा त्याचा स्वतःच्या स्टाइलवर जास्त विश्वास. त्याच्या मते संगीत म्हणजे मुक्तीकडे नेणारा मार्ग. सध्या संगीत सुना कम, देखा बहोत जाता है, असलं काहीतरी भन्नाट बोलला. त्याच अनुशंगाने, आजही भारतात संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्था तशा कमीच आहेत, पण त्यांची दुकानंच जास्त झालीत, असंही त्यानं सर्वांसमक्ष सांगितलं. आपण रिअँलिटी शोमध्ये जज म्हणून जातो, पण त्यामागे नवं टॅलेंट बघणं हाच एक भाव असल्याचं त्याचं मानणं होतं. त्याच्या या मुलाखतीमध्ये त्याच्याविषयी जेवढी जास्त माहिती मिळत गेली, तितका तो अधिकाधिक गूढ आणि काहीतरी वेगळाच माणूस असल्याचं वाटायला लागलं होतं. त्यातचं त्याने तेरी दिवानी गाण्याचा किस्सा सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार, मुलांना वाटतं की तेरी दिवानी हे गाणं एखाद्या मुलीच्या मनातून आलंय आणि त्याचवेळी मुलींना त्याच्या अगदी उलट वाटत राहातं. त्यामुळे ते त्यांना अधिकाधिक आवडत जातं. पण ते गाणं आपण आपल्या शिवबाबासाठी लिहिलंय. तेरी दिवानी म्हणजे मी त्याच्या प्रेमात आहे. त्यामुळेच कदाचित ते सगळ्यांनाच आपलंस वाटत राहातं. अशा प्रकारामधूनच आपल्या फॅन क्लब वाढल्याचं त्याने सांगितलं. 

दोन्ही कानात डूल, दाट वाढलेले कुरळे केस, डार्क निळ्या रंगाचा शर्ट आणि तशीच डार्क शेडमधली त्याची ती पँट, शर्टच्या बाह्या वर करून सर्वांशी अगदी अदबीने आणि तितक्याच सहजतेने त्याचं ते बोलणं, त्यातच पत्रकार संघासारख्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आल्याचं सांगणं, पुणे म्हणजे आपल्यासाठी पुण्यनगरी असल्याचं मानणं... त्याचं हे वागणं-बोलणं त्याच्यासाठी सहज असलं, तरी माझ्यासारख्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं. आपण एका वेगळ्या माणसाला, कलाकाराला अनुभवतोये हेच काय ते समाधान होतं, पण अजूनही तो कसा हे लक्षात आलं नाहीये. आत्ताच्या मुलाखतीतही त्याने विशाल-शेखर की रेहमान बेस्ट, या प्रश्नाचं उत्तर दोन्हीही बेस्ट असंच दिलं. जिंगल्स लिहिणं का गाणं म्हणणं जास्त आवडतं, असं विचारल्यावर जिंगल किंवा गाणं लिहून ते स्वतः गाणं हेच जास्त प्रिय असल्याचं त्यानं सांगितलं. त्याने मुलाखतीचा शेवट केला तो, कैसे बताये क्यूँ तुझको चाहे, यारा बता ना पाये, बातें दिलों की देखो जो बाकी आँखे तुझे समझाये, तू जाने ना... गाण्यानं. आता पुन्हा त्याच्याविषयीची गूढता, तू जाने ना असंच म्हणताना भासतेय मला.