सोमवार, १८ जुलै, २०१६

न लिहिलेल्या बातमीविषयी...



दोन दिवस भुसावळला चक्कर मारून आलो. पहिल्यांदाच पुण्यातून एकट्याने गाडी चालवत भुसावळला घेऊन गेलो होतो. त्यामुळं माझ्यासाठी पुणे- भुसावळ- पुणे हा प्रवास तसा एक्सायटिंग असाच ठरला होता. तिकडं जाण्याचं कारण म्हणजे भाऊंच्या, माझ्या वडिलांच्या तीन कवितासंग्रहांचं प्रकाशन आणि त्या निमित्ताने आयोजित एक छोटेखानी कार्यक्रम. 'वाट वळणाची', 'माय गाणं' आणि 'मानसगान' हे ते तीन कवितासंग्रह. 'वाट वळणाची'साठी कवी म्हणून ' प्रा. सोपान बोराटे ' असं लिहावं लागणारे भाऊ, 'मानसगान' प्रकाशित होईपर्यंत, माझ्या आईने सारखं मागे लागून पीएचडी करायला लावल्यानं डॉ. सोपान बोराटे झालेत. सायकॉलॉजी हा त्यांचा विषय आणि त्याच विषयात ध्यानधारणेचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कामगिरीवर होत असलेला परिणाम अभ्यासून त्यांनी पीएचडी केली. कवितासंग्रहांचे विषय मात्र तसे सामाजिक. 'वाट वळणाची' हा एड्सविषयी, तर 'माय गाणं' हा स्त्री-भ्रूणहत्या, दुष्काळ, प्रदूषण अशा वेगवेगळ्या सामाजिक समस्यांविषयी भाष्य करणारा कवितासंग्रह. 'मानसगान' कवितासंग्रहामध्ये मात्र तसं सगळं मानसशास्त्रच. गद्य लेखनातून डोक्यात उतरलेलं आपलं शास्त्र विद्यार्थी- विद्यार्थिनींनी कवितेच्या आधारे गुणगुणत राहावं, म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न या तिसऱ्या काव्यसंग्रहाचा भाग बनले आहेत. या तिन्ही कवितासंग्रहांचं एकाचवेळी झालेलं प्रकाशन मी अनुभवलं. बातमीदार असलो, तरी बातमी न लिहिता.

खरं तर, त्यांचं कवितालेखन मी खूप लहानपणापासूनच पाहात आलोय. कविता लिहिण्यासाठी, सुचल्या सुचल्या ती कागदावर उतरवण्यासाठी ते पाठकोऱ्या कागदांचा वापर करायचे. कविता पक्की लिहून झाली, की ती डायरीमध्ये नोंदवून ठेवायचे. अशा कितीतरी डायऱ्या सध्या घरात आहेत. थोड्या मोठ्या, सलग काही पानं चालणाऱ्या कविता लिहिण्यासाठी नंतर त्यांनी फुलस्केपची कागदं वापरायला सुरुवात केली. अशा कविता एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी मग अगदी पातळ आणि पारदर्शी अशा प्लॅस्टिकच्या ए- 4 आकाराचा कागद बसेल अशा पिशवीत ही कागदं
ठेवायला सुरुवात केली. कविता लिहिलेली ही कागदं त्यांनी फायलिंग करून ठेवल्याने, कच्च्या स्वरुपातील त्यांचे ते न छापलेले कवितासंग्रहच बनलेत. अक्षरशः हजारो कविता त्यांनी अशाच पद्धतीने लिहिल्या आहेत. त्याच्या जाडजूड फाइल्स घरात कपाटात ठेवल्या आहेत. त्यातल्याच काही कवितांचे आता संग्रह बनलेत. या संग्रहांचं आता प्रकाशन होतंय, असे विचार एकदम सर्रकन डोळ्यासमोरून ओझरते निघून गेले. प्रकाशनच्या ठिकाणी गेल्यावर अशा सर्वच आठवणी आपोआपच डोळ्यासमोर येत गेल्या. समोरचे वक्ते बोलत गेले, मी त्यांच्या बोलण्याच्या संदर्भाने भाऊंचं वागणं पाहात गेलो. बातमी तर लिहायचीच नव्हती, त्यामुळं मग त्यावेळचे नी आत्ताचे सगळे संदर्भ जोडत राहिलो. त्यांच्या कवितांसाठी म्हणून एखादा ब्लॉग सुरू करावा, असं खूप दिवस डोक्यात आहे. त्यांच्या कविता काही हजारांमध्ये असल्यानं, हे काम करायचं म्हणजे फक्त हेच काम असंच करावं लागणार आहे, याची जाणीव आहे. आता त्यांचं लेखन प्रकाशित व्हायला सुरुवात झालीये म्हटल्यावर हे काम करायलाही निश्चितच बळ मिळणार आहे.

प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी जळगावचे प्रा. डॉ. किसन पाटील , भुसावळमध्ये मी ज्या नाहाटा कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजचे डॉ. के. के. अहिरे हे मराठी विषय आणि त्यातही कवितेच्या प्रांतात सहजतेने वावरणारे लोक उपस्थित होते. भाऊंचे मानसशास्त्रामधले गुरु आणि मानसशास्त्रात ज्यांच नाव दिग्गजांपैकी एक असं म्हणून विचारात घेतलं जातं ते डॉ. सी. जी. देशपांडे सरही खास पुण्याहून भुसावळला आले होते. 'पहिल्या दोन कवितासंग्रहांविषयी भाष्य करायला मराठी साहित्यातील अभ्यासक मंडळी योग्य आहेत. मात्र, मानसशास्त्राविषयी डॉ. बोराटेंनी लिहिलेल्या कवितांविषयी भाष्य करायला मानसशास्त्र जाणणारा नी त्याचं कवितेत रुपांतर झाल्यावर त्याचं महत्त्व समजलेला माणूसच हवा,' हे डॉ. देशपांडेंचं मत त्यांच्या मनोगतातून नंतर व्यक्तही झालं आणि उपस्थितांनाही ते पटलं. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, त्या स्वातंत्रसैनिक नामदेवराव चौधरी सार्वजनिक वाचनालय- ग्रंथालयाच्या कार्यकारणीचे प्रमुख आणि आमच्या नाहाटा कॉलेजचे माजी ग्रंथपाल, कॉलेजच्या कल्चरल कार्यक्रमांच्या टीमसाठी कायमच हवेहवेसे वाटणारे आमचे देशमुख सर, तिथल्या लोकांसाठीचे डॉ. डी. एम. देशमुख सर तिथं होते. महत्त्वाचं म्हणजे भाऊंचे भुसावळमध्ये गेल्यापासूनचे अगदी जवळचे मित्र आणि सध्या जळगावला प्राचार्य असणारे लोहार काका, प्राचार्य डॉ. अनिल लोहार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाशक मंडळी नी आमच्या बोराटे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्यांचा गोतावळाही तिथं या कार्यक्रमासाठी म्हणून हजर राहिला होता.


कार्यक्रमात बोलणाऱ्या प्रत्येकानेच भाऊंची वैशिष्ट्ये सगळ्यांना सांगितली. भाऊंना वेगवेगळ्या निमित्ताने अनुभवलेल्या व्यक्तींना ती नवी नव्हती, मात्र ती अशी जाहीरपणे सगळ्यांना सांगणे, त्यांचं कौतुक करणे हे सगळ्यांनाच काहीसं नवं होतं. भाऊंना जे जवळून ओळखतात, त्यांना त्यांचा स्वभावही व्यवस्थित माहिती आहे. कार्यक्रमाचे सोपस्कार, असे कौतुक सोहळे वगैरेत ते कधी अडकून पडले नाहीत, पडणारही नाहीत. आपलं काम आपण करत राहायचं, या हिशेबाने त्यांनी राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्ध निर्मूलन समितीमधून आपलं काम केलंय. महत्त्वाचं म्हणजे त्याचा कॉलेजमधल्या आपल्या शिकवण्यावर परिणाम होऊ न देता. कॉलेजमध्ये सकाळी सकाळी पहिलं लेक्चर घेणं तसं अनेक प्राध्यापकांना आवडत नसतं. बातमीदारीच्या निमित्तानं मी शिक्षण क्षेत्रातले बारकावे पाहताना या क्षेत्राचे न पाहिलेले रंगही अनुभवत चाललोय. त्यातलाच तो प्रकार, पण भाऊंनी ते पहिलं लेक्चर मुद्दाम कधीच चुकवलं नाही. घरातून अभ्यास करून गेल्याशिवाय वर्गात शिकवायला उभं राहायचं नाही, जे वर्गात शिकवायचंय ते किमान दोनदा वाचून मगच वर्गात शिकवायला जायचं, हा नियम ते पाळतात. आमचा मामा प्राध्यापक झाल्यावर त्यालाच नाही, तर त्यांचे जे जे विद्यार्थी शिक्षक बनले त्यांनाही त्यांनी अनेकदा त्यांचा हा नियम सांगितलेला मी स्वतः ऐकलाय. ते हा नियम स्वतः पाळतात हे मी घरात पाहिलंय. घरातले बाकीचे सगळे उठायच्या आधीच ते त्यांचं काम करत बसलेले मी नेहमीच पाहात आलोय. त्यांचं शिकवणं, त्यांचं कवितालेखन, त्यांचं सामाजिक कार्य आणि शेवटी फक्त प्राध्यापक म्हणून नाही, तर एक चांगला माणूस म्हणून प्रत्येकाशी जोडलेलं त्यांचं नातं या कार्यक्रमात पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. हे सगळं आम्हा सगळ्यांसाठीच किती महत्त्वाचं होतं, ते आईच्या डोळ्यात आलेल्या पाण्याने सगळ्यांनाच जाणवलं.

वैयक्तिकरीत्या मी कवितेपासून तसा बराच लांब. दहावीपर्यंत मराठीत काय त्या कविता अभ्यासल्या. नंतर पुढे प्रासंगिक कविता नी गाणी आवडली तेवढीच. अभ्यास म्हणून वगैरे कधी पाहिलं नाही. त्यामुळं भाऊंनी एवढं सारं साहित्य घरात तयार करून ठेवलं असलं, तरी त्यातलं अगदी मोजकंच मी वाचलंय. त्यांच्या लेखनावर भाष्य करण्याची क्षमता माझी नाहीच मुळी. पण या कार्यक्रमात उपस्थित दिग्गजांनी सांगितलेली मतं मला नक्कीच महत्त्वाची वाटली. एकतर भाऊंनी लिहिलेल्या कविता या केवळ मनोरंजनासाठी नाहीत, त्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांपुरत्याही मर्यादीत नाहीत. सामाजिक आशय असणारे भाष्य कवितेतून करताना लोकांना रुचण्यासाठी म्हणून प्रचलित गाण्यांच्या चालींवर त्यांनी अनेक कविता- गाणी लिहिली आहेत. पाणी पोवाडा, एड्सची लावणी, साने गुरुजींचा पाळणा ही त्यातलीच काही उदाहरणं. मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी जोपासलेली संशोधकवृत्तीही त्यांच्या कवितांचा भाग बनू शकली. सामाजिक समस्यांवर भाष्य करताना, सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या शब्दांमध्ये, कुठेही बोजडपणा न ठेवता त्यांनी त्यांचं साहित्य पुढे आणलंय. ते आता आणखी पुढे जाणार यात काहीही शंका नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते ही पाहिलं. कार्यक्रमाला हजर नसला, तरी कार्यक्रमाच्या नियोजनातून ज्याने आपली आठवण टप्प्याटप्प्यावर करून दिली तो स्वप्नीलदादा, अर्थात स्वप्नील चौधरी , ज्यांनी हा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजर कमी नी घरचं माणूस म्हणून जास्त, यशस्वी करून दाखवल्या त्या उर्मिला वहिनी, चंदू काका अशी अनेकांनी खरं तर हा कार्यक्रम आमच्यासाठी खूपच मोठा बनवला. त्यामुळंच बातमीसाठी गेलो नसलो, तरी त्या विषयी इतकं काही लिहावंस वाटलं. तिथल्या इतर स्थानिक वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाच्या बातमीची दखल घेतली. माझ्यासाठी मात्र हा कार्यक्रम म्हणजे न लिहिलेली बातमी बनला. अर्थात बातमीमागची बातमी लिहित असताना समोर आलेले असे सारे संदर्भ मनाला स्पर्शून गेले. तेच या कार्यक्रमाचं महत्त्व ठरलं.

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

पुस्तकं, पेन नी पिंटो

बघायला गेलं, तर माझं पुस्तकांविषयीचं प्रेम तस जुनंच. पेनांच्या बाबतीतही जवळपास तिच परिस्थिती. वडील, मामा प्राध्यापक. त्यामुळं घरात लहानपणापासूनच पुस्तकांच्या ढिगांमध्ये वावरण्याची सवय लागलेली. मामाकडे तर साठवून ठेवलेल्या पेनचा खजानाच असे. ते त्यांची सुटकेस कधी उघडतात, याकडे माझं तसं बारीक लक्ष असायचं. सुटकेस उघडली की हमखास एखादं तरी पेन मिळे. त्यांच्या लेखी ते जुने, आमच्यासाठी मात्र नवं कोरं, रिफिल टाकली की काम झालं. वडील बाहेरगावी गेल्यावर आम्हाला तिकडचं खायची काही चीज आणतील याची खात्री नसायची. हं, प्रत्येकवळी त्यांच्या बॅगमधून खास आमच्यासाठी म्हणून नाव घालून आणलेली पुस्तकं मात्र सापडायचीच. त्यासोबतच वाढदिवसांच्या दिवशीही पुस्तक खरेदी व्हायची. त्यामुळे पुस्तकांचा लळा तसा लहानपणापासूनच लागला. खेळून खेळून थकलो नी अभ्यासाच्या पुस्तकांनाही हात लावू वाटेना, की ही पुस्तकं खूप मदत करायची त्यावेळी. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी का होईना वाचतोय, याचं त्यावेळी घरच्यांनाही समाधान असे. या दोन्ही गोष्टी एकदम आठवायचं कारण ठरले ते पिंटो. रानडेतल्या माझ्या दोस्तांना या नावाची नव्याने ओळख देण्याची तशी गरज नाही. इतरांसाठी सांगायचं तर ते आमचे रानडेतले पत्रकारितेचे मास्तर. मास्तर म्हणायचं कारण ते वर्गात तसेच असत, पण वर्गाबाहेर मात्र एक अप्रतिम माणूस.  खरं तर हा ब्लॉग मी त्यांच्याच एका असाइन्मेंटसाठी म्हणून सुरू केला होता. त्यांनीच ब्लॉगची ही भानगड वर्गात सांगितली होती नी तो सुरू करायलाही भाग पाडलं होतं. आता तो अधूनमधूनसाठी का होईना पण, अजूनही सुरू आहे.

परवा त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज होता. विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमाच्या गडबडीत असल्याने, मी तो पाहिलाही नव्हता. थोड्या वेळाने लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यानंतर आलेले इतरांचे मेसेज त्यांच्या मेसेजच्या वर येऊन पडले होते. सगळ्यात वर सोनालीचा मेसेज होता, 'उद्या पिंटो सरांकडे जायचं का? ते विचारतायेत. दोन- तीन तासांचं काम आहे. त्यांना मदत हवीये. वेळ असेल तर, मला सांगा म्हणतायेत,'. मी म्हटलं, 'बोलूयात संध्याकाळी,'. तोपर्यंत परत मेसेज, 'सर माझ्याशी बोलतायेत आत्ता...' मी म्हटलं, 'जाऊयात आपण, वेळ तूच कळव त्यांना,'. असं सांगून मी आपलं पुन्हा कार्यक्रमाच्या वातावरणात शिरलो. त्यांचं नेमकं काय काम होतं ते माहिती नव्हतं, मी विचारायच्या भानगडीतही पडलो नव्हतो. संध्याकाळी समजलं, पुस्तकांच्या संदर्भाने काही तरी आहे. त्यांच्या घराचं शिफ्टिंग आहे. त्यांच्याकडे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यातली जी आवडतील, ती पुस्तकं घेऊन जायला त्यांची परवानगी आहे वगैरे वगैरे. खरं तर त्यांच्याकडे जायचं प्लॅनिंग आमचं ख्रिसमसपूर्वीही एकदा ठरलं होतं. पण ते काही जुळून आलं नाही. या वेळी म्हटलं जाऊनच येऊयात.

शनिवारच्या सुट्टीदिवशीचा चांगला प्लॅन म्हणून मी त्यांच्या घराकडे गाडी वळवली. सहकारनगर भागातल्या 'आपली सोसायटी'च्या बोर्डजवळ थांबून ते तिथेच राहतात ना याची खात्री करून घेतली नी गेलो आत. घरासमोर उभं राहून बेल वाजवली. मला दारात बघताच पिंटो सर नेहमीच्याच पद्धतीने म्हणाले, 'अरे ये भाऊ. मी किती वेळ तुझी वाट बघत होतो. ये बैस. तुझ्यासाठी म्हणून काढून ठेवलेली पुस्तकं मी पुन्हा आत ठेवूनही दिली. आता तूच आण ती बाहेर आणि निवडून घे हवी ती.' आत गेल्यावर आजूबाजूला आवराआवरीसाठी म्हणून काढलेल्या सगळ्या वस्तू, पुस्तकं काढलेली दिसली. घराचं शिफ्टिंग होणार आहे. त्यामुळे मग सगळंच काढलंय. व्यवस्थित पॅकिंग करून सामान हलवायचंय असं सगळं सगळं या दरम्यानच्या काळात समजलं. थोडं निवांत झाल्यावर मग पिंटोंनी पुन्हा आत बोलवलं. 'त्या दोन पिशव्या काढ. त्यात तुझ्यासाठीची म्हणून पुस्तकं आहेत. त्यातून तुला जी हवी आहेत, ती निवडून घे,' असं सांगत त्यांनी दोन भल्या मोठ्ठ्या पिशव्यांकडे बोट दाखवलं. पिशव्यांच्या आकारावरूनच त्या मला उचलता येणार नाहीत हे लक्षात आलं होतं. मी त्या पिशव्या ढकलतंच बाहेर काढल्या. पिशव्यांमधला खजाना एकेककरून बाहेर काढायला सुरुवात केली.

'तुझ्यासाठी निवडून ठेवलेली पुस्तकं,' असं ते का म्हणाले, याचं कारण ही पुस्तकं बाहेर काढताना जाणवू लागलं. काही पुस्तकं खास विज्ञानाला वाहिलेली अशी दिसत होती. काही पुस्तकं पत्रकारितेशी संबंधित अशी होती. 'द लाइफ ऑफ पाश्चर' हे लुई पाश्चरच्या जीवनाची माहिती देणारं १९१९ साली प्रकाशित झालेलं पुस्तक, 'ग्रेट आयडियाज इन फिजिक्स' हे फिजिक्सच्या विविध तत्त्वांची रंजक पद्धतीने माहिती देणारं पुस्तक, 'द सागा ऑफ इंडियन सायन्स सिन्स इंडिपेन्डन्स' हे भारतातील विज्ञान- तंत्रज्ञानाच्या वाटचालीचा आढावा घेणारे पुस्तक, 'अब्लेझ- द स्टोरी ऑफ चर्नोबिल' हे चर्नोबिल दुर्घटनेवर आधारित पुस्तक, 'व्हाय आर थिंग्स द वे दे आर?' हे विज्ञानातील छोट्या छोट्या तत्त्वांवर प्रकाश टाकणारं पुस्तक, लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने १९८३ मध्ये प्रकाशित केलेलं 'वॉटर' हे फक्त पाण्यावर आधारित पुस्तक अशी विज्ञानाला वाहिलेली एकसे बढकर एक पुस्तकं त्यात होती. 'रिप्रेझेंटिंग ऑर्डर' हे क्राइम आणि कोर्ट रिपोर्टिंगवर आधारित पुस्तक, 'बेटर सेड अँड क्लिअर्ली रिटन' हे बिझनेस कम्युनिकेशनवर आधारित पुस्तक, जवाहरलाल नेहरूंच 'द डिस्कव्हरी ऑफ इंडिया', सुशिला नायर आणि कमला मानकेकर यांनी संपादीत केलेलं 'विमेन पायोनिअर्स इन इंडियाज रेनिसान्स' हे पुस्तकंही याच खजिन्यात सापडलं. अशा इंग्रजी पुस्तकांसोबतच राजा मंगळवेढेकरांचं 'हिरवे सोबती' हे झाडांची माहिती देणारं पुस्तक, 'गोमंतकाची भूषणे' हे गोव्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती देणारं पुस्तक, प्रभा गणोरकर यांनी संपादित केलेलं 'बोरकरांची निवडक कविता' हे कवितेवर आधारित पुस्तक, 'हिंदू संस्कृती आणि स्त्री' हे आ. ह. साळुंखे यांचं पुस्तक, अगदी ताजं म्हणायला डॉ. पंडित विद्यासागरांनी लिहिलेलं 'ओवी गाऊ विज्ञानाची' हे पुस्तक, अशी मराठी पुस्तकही या दोन पिशव्यांमधून बाहेर आली. अर्थातच अशी सारी पुस्तकं निवडून मी माझ्यासाठी वेगळी काढली.


हे झालं की त्यांनी मला वेळ आहे का, ते विचारलं. मी म्हटलं, 'आहे सर'. मग त्यांनी आत एका कोपऱ्यात ठेवलेल्या एका बॉक्सकडे बोट दाखवत म्हणाले, 'हे बघ भाऊ, हा जो बॉक्स आहे ना, त्यात माझ्याकडची 'टेन आऊट ऑफ टेन'वाली पुस्तकं आहेत. तू निवडलेली पुस्तकं 'वन आऊट ऑफ टेन'वाली आहेत. त्या बॉक्समधली पुस्तकं सध्या तरी मी कोणालाही देणार नाहीये. कारण ती मला कधीकधी लागतात. पण तू एक काम करू शकतोस. तू ती पुस्तकं बघू शकतोस. त्यातून जी पुस्तकं तुला हवी आहेत, असं वाटेल, त्या पुस्तकांची नावं तू त्या वहीमध्ये लिहून ठेव. वर लिही 'सर, प्लिज रिझर्व्ह फॉलोइंग बूक्स फॉर मी,' आणि खाली तुझं नाव लिहून पुस्तकांची यादी नीट लिहून ठेव. मग मला ज्यावेळी वाटेल की ती पुस्तकं द्यायची आहेत, त्यावेळी मी त्यातली तुला हवी असलेली पुस्तकं तुलाच देईन.' मग काय, ते भलं मोठ्ठं खोकं मी ढकलतच बाहेर आणलं. साधारण अर्धा- पाऊण तास त्या खोक्यातून पुस्तकं काढणं, ते चाळणं आणि हवं असेल तर त्या यादीत नोंद करून ठेवण्याचा कार्यक्रम झाला. दरम्यानच्या काळात एक मस्त फक्कड कॉफीही झाली. ती पुस्तकांची यादी झाल्यावर पुस्तकं जशी काढली होती, तशीच, त्याच क्रमाने आणि त्याच ठिकाणी ती खोक्यामध्ये पुन्हा भरून ठेवली. पुस्तकांना हात लावण्याआधी पिंटोंनी तशी अटच घातली होती. ते खोकंही जागच्या जागी परत गेलं.

पुस्तकं व्यवस्थित नेण्यासाठी म्हणून त्यांनी मला एक भली मोठी पिशवी आणून दिली. त्यात ती पुस्तकं भरली नी मी निघायच्या तयारीला लागलो. दारात जाऊन चप्पल घालेपर्यंत पुन्हा त्यांनी हाक मारली. 'भाऊ, तुला पेन आवडतात का?', नाही म्हणायचा संबंधच नव्हता. 'माझ्याकडे खूप सारे पेन आहेत. त्यातले काही तर वापरलेलेही नाहीत. तुला हवे असतील, तर त्यातले घेऊन जा,' म्हणत त्यांनी मला पुन्हा आत नेलं. एक प्लॅस्टिकची पिशवी हातात दिली. त्या पिशवीत पेनचे खूप सारे बॉक्स होते. मी एकेक करून ते बॉक्स पाहू लागलो. सर्वच तशी महागडी पेन होती. घेऊ का नको, असा विचार मनात येत होता. सर म्हणाले, 'तू बिनधास्त हवं ते घेऊन जा. मी 'महाराष्ट्र हेराल्ड'मध्ये एडिटर असताना अशी खूप सारी पेन आम्हाला मिळत असत. मी त्या वेळीही वाटूत टाकत होतो. आताही तसंच करतो.' मग मी त्यातून दोन थोडे वेगळे बॉक्स निवडले. एक अगदी नाजूकसं पेन आहे. नंतर पाहिल्यावर समजलं, की ते जपानी पेन 'सन प्रिन्स' नावाच्या कोणा कंपनीचं आहे. आपल्या हातात ते खूपच लहान दिसतं, पण खूपच छान आहे. नी दुसरा बॉक्स होता तो एक फाउंटन नी एक रॉलर पेन एकत्र असलेला. असे दोन पेनचे बॉक्स मी घेतले, नी बास म्हणत त्यांचा निरोप घेतला.

पुस्तकांच्या पिशवीवरच ते पेनचे दोन बॉक्स ठेवले नी दारात आलो. ते मला सोडायला दारात आले. चप्पल घातली नी पिशवी दोन्ही हातांनी उचलतानाच त्यांनी मला निरोप देण्यासाठी जवळ घेतलं. दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही गालांवरून हात फिरवत म्हणाले, 'योगेश अल्वेज बी ए गुड बॉय.' मी म्हणालो, 'डेफिनेटली सर'. लाइट गेल्याने जिन्यात अंधार होता. मी हळूहळू जिना उतरत होतो. तेवढ्यात लाईट आले. ते पुन्हा वरून म्हणाले, 'भाऊ तू एकदम लकी आहेस बघ. सोनालीलाही सांग. पुढच्या वेळी तिला घेऊन ये. तिला सांग मेहनत करावी लागते. तू इथे येण्याची मेहनत घेतलीस म्हणून तुला पुस्तकं दिली, ती आली की तिलाही देईन...' अशी प्रेम करणारी, नुसतं बोलूनच नव्हे, तर कृतीतून दातृत्व शिकवणारी, छोट्या छोट्या गोष्टीतून मेहनतीचं चीज होणं काय असतं हे दाखवून देणारी माणसं आपल्यासोबत असल्याची जाणीव झाली, तर कोणाला वाटणार नाही की आपण लकी आहोत म्हणून. है ना.