शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

रविशचे आभार, कारण की...


ब्लॉगवरची ही सलग तिसरी पोस्ट आहे, की जी एका पत्रकाराविषयीची आहे, पत्रकारितेच्या क्षेत्राविषयीची आहे. या तिन्ही पोस्टसाठी विचार झालेल्या प्रत्येकाचंच काम, त्यांचा लौकीक, त्यांचं समाजामध्ये असणारं स्थान हे निश्चितच महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं ठरतंय ते त्यांच पत्रकार असणं नी पत्रकारितेविषयी तितकंच जास्त सकारात्मक असणंही. तेही एका अशा काळामध्ये की ज्या काळात पत्रकारितेची गरज आहे की नाही, या विषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पत्रकारिता संपली आहे की काय, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. खरं तर आता 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा जमाना सुरू झालाय. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्येही त्याचा शिरकाव होऊ लागला आहे. तंत्रज्ञानामधील बदलांचा विचार करता, तो तसा स्वाभाविकच म्हणावा लागणार आहे. आता अशा परिस्थितीत विचार करू शकणाऱ्या माणसांची म्हणा गरज उरणार तरी कोणाला आहे. ज्यांना उरणार आहे ते कदाचित बहुसंख्यांच्या रेट्यामधले नसतीलही. कारण कदाचित ते तंत्रज्ञानापासून अलिप्त असू शकतील. तसे मोजकेच निघतील. अशांसाठी काम करणारे जे कोण असतील, ते कदाचित मग पत्रकार ठरतील बहुदा. हे भविष्यात होईल तेव्हा होवो. आत्ता वर्तमानात काहीशा तशाच, एका विचार करणाऱ्या पत्रकाराविषयी लिहू वाटलंय. रविश कुमार हे त्याचं नाव.

त्याला रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळालाय म्हणून हे लिहू वाटणं जरी असलं, तरी निव्वळ तेवढंच कारण नाही. सचिन तेंडुलकरला अगदी प्रेमाने नी हक्काने सच्या म्हणेपर्यंतच्या पातळीवर आपण पोहोचलो होतो. तेवढी आपुलकी आपल्याकडे होती. तसंच एखाद्या मोठ्या चॅनेलच्या मॅनेजिंग एडिटरला अगदी आपल्याच एखाद्या दोस्तासारखी हाक मारावी, तेवढा हक्क गाजवावा असा अधिकार नी तेवढीच आपुलकी देणारं जर कुठलं एखादं नाव अलिकडच्या काळात आमच्यासारख्या पोरांसमोर आलं असेल तर ते रविश कुमारचं. अनेकदा गरज नसताना, अनेकदा तशी पात्रताही नाही हे माहिती असतानाही अनेकांना नावापुढे जी वगैरे लावून लोकं आपली विनम्रता दाखवतात. अनेकांना सर म्हणावं लागतं. रविश याला अपवाद ठरतो. म्हणजे त्याच्याविषयी आमच्यासारख्यांच्या मनात आदर नाही असं अजिबातच नसतंय. पण एक हक्क गाजवण्यातून, तो किती जवळचा आहे ते दाखवण्याच्या पद्धतीतून कदाचित अगदी साहाजिकच रविशचा शो पाहिला का, असं अनेकजण अनेकदा एकमेकांना विचारू शकतायेत. ही आपुलकी तो आपल्याला अगदी नावासकट ओळखतोय म्हणून नाही आलेली. त्याच्या पत्रकारितेच्या शैलीतून ती तुम्हा- आम्हाला त्याच्या तितकी जवळ घेऊन गेली आहे. औपचारिकतेची बंधनं त्याने कधीच मोडून टाकलीत. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्याचं ते सायकल रिक्षामधून फिरणं, भर बाजारात वा अगदी माणसांच्या वाहत्या जथ्थ्यांमधून अगदीच किरकोळ दिसणाऱ्याला समोर घेत त्याच्याशी बोलणं, ती त्याची शैली त्याला जनसामान्यांच्या जवळ घेऊन आलीये. माझ्याही. त्यामुळे हे लिहू वाटलं. त्याच्यासोबतच्या दोन भेटीत अनुभवायला मिळालेला रविश कुमार हाही तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणून मग ते वाटणं कृतीत बदललं.

       त्याच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा मागे आमच्या अंगदनी अगदी भारी शब्दांमध्ये चितारला होता. गेल्या वर्षी रानडेच्या दिल्ली दौऱ्याचा तो प्रसंग होता. पोरांना रविश कुमारला भेटायचं होतं. मी आपला एक साधा मेसेज पाठवला होता. पत्रकारितेचे विद्यार्थी घेऊन दिल्लीत आलोय, तुम्हाला भेटायचंय वगैरे लिहिलं होतं. त्याचा एक रिप्लाय आला, सोमवारको ले आईये’. त्याच्या त्या एका रिप्लायवर एनडीटीव्हीच्या ऑफिसला पोहोचलो होतो. ट्रॅफिकने दगा दिला होता, तरी आम्ही ट्राय केला. सिक्युरिटीच्या भानगडी टाळायच्या म्हणून आधी अंगद नी मी असं दोघंच तिकडे गेलो. तो प्राईम टाइमच्या गडबडीत होता. तरीही तो जिने उतरून आम्हा दोघांना भेटण्यासाठी खाली आला. आता गडबडीत शक्य नाही, उद्या परत आलात तरी चालेल म्हणत त्याने निरोप घेतला होता. त्यादरम्यानच्या काळात अनुभवलेला रविश कुमार हा कामाच्या घाईगडबडीत कसा असेल, हे स्पष्टपणे दाखवणारा होता. पण म्हणून तो पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विसरू शकला नव्हता. त्यांच्यासाठी तो प्राईम टाईमची मीटिंग सोडून खाली आला होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवण्याची तयारी दाखवणारा तो होता. आमच्या हाती त्यावेळी हे पत्रकारितेचंच भांडवल होतं काय ते. दुसऱ्या दिवशी भेट शक्य झाली नाही.

यंदाच्या दौऱ्यात हा अनुभव गाठीशी होताच. ट्रॅफिकचं भयंकर प्रकरणही लक्षात होतं. रविश कुमारच्या भेटीसाठी थेट एचआरपासून सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाले होते. त्याला वैयक्तिकरीत्या पाठवलेले मेसेज हे परत वेगळेच. एनडीटीव्हीच्या स्टुडिओची वेळ मिळाली होती. एचआर स्वतः आम्हाला विद्यार्थ्यांसोबत स्टुडिओ दाखवायला येणार होते. त्या अनुषंगाने वेळ लक्षात घेत तिकडे सुटलो होतो. या वेळी ट्रॅफिकनं पुन्हा दगा दिला. गाड्या पाक तिकडं चार किलोमीटरवर सोडून आम्ही एनडीटीव्हीच्या दिशेने चालत निघालो होतो. वेळ गाठायची होती. एचआरनं स्वागत करत आम्हा सगळ्यांना दोन गट करत स्टुडिओ वगैरे दाखवला. मात्र, सगळ्यांना रविश कुमारही हवा होता. तो भेटायची चिन्ह दिसत नव्हती. स्टुडिओ बघून आम्ही परत गाड्यांकडे निघायच्या बेतात असताना त्याला केलेल्या मेसेजवर त्याचा रिप्लाय आला आला, आ जाओ. रिप्लाय दिला, ऑफिसच्या खालीच आहोत. एचआरला सांगितलं. त्यांनाही ते तसं शॉकिंगच होतं. त्यांनी लगेच परत आतली व्यवस्था कामाला लावली. तोपर्यंत आम्ही तूर्तास रिसेप्शनच्या जवळची खोली पोरांसह भरून टाकली. म्हटलं तर तिच खोली होती, जिथं मी नी अंगद गेल्या वेळी त्याची वाट पाहात थांबलो होतो. आता आख्खा वर्ग त्यात अक्षरशः कोंबला होता. रविश समोर येऊन बसला होता. मी उभाच होतो, अगदी त्याच्या खुर्चीच्या शेजारी. मोजक्यांना बसायला जागा मिळाली होती. तांबट सर समोर होते, काही मुलं बसली होती, अनेक उभी होती. पण म्हणून कोणाचीच कसलीच तक्रार नव्हती. त्यावेळीही नव्हती नी त्यानंतरच्या जवळपास आख्ख्या दौऱ्यातही नव्हती. कदाचित त्यांना जे हवं होतं ते त्या एका भेटीनंच त्यांना दिलं होतं.  
        
         
त्या रुमच्या बाहेर अगदी सुरुवातीच्या भेटीतंच रविशनं पोरांना दिल्लीतल्या वह सब लाल, झिरो रिझल्टवाली बिल्डिंग वगैरा देख ली, असा प्रश्न विचारून बोलतं केलं होतं. मी कुठूनही कुठेही सुरू होऊ शकतो, पण तुम्ही तुम्हाला काय हवं ते विचारा, असं हिंदीमधून म्हणत रविश त्या खोलीत आत आला. सोबत 'एचआर'ही होते. त्यांचा तो सब लाल बिल्डिंग झिरो रिझल्टवाली बिल्डिंग वगैरा चा संदर्भ घेत तांबट सरांनी त्याच अनुषंगाने सुरुवातीचा प्रश्न विचारत फ्लोअरचा टोन सेट केला होता. त्या अनुषंगाने त्याने बोलणं सुरू केलं. खूप वाचणं, खूप जास्त तांत्रिक मुद्दे समजून घेणं हे पत्रकारांसाठी कसं महत्त्वाचं आहे ते त्याने सांगितलं. सध्या पत्रकारिता व्हिजिटिंग कार्ड, नवनवी पदं वगैरेतच अडकून पडली आहे, तुम्ही त्यात पडू नका. मी माझ्या 'एचआर'कडे त्यासाठी कधीही गेलो नाही, असं सांगत त्याने वस्तुस्थितीवर सहजच पण नेहमीसारखंच तिखट भाष्य केलं. पढनेका बॅकग्राऊंड बनाके रखो. कल व्हॅलेंटाइन डे है, तो थोडा मजाभी करो,’ हे दरम्यानच्याच काळात सांगायलाही तो विसरला नाही. रोज चार तास वाचणार नाही, तर तुम्ही स्वतः स्वतःला फसवणार आहात. वाचाल तर तुम्ही कायम इतरांपेक्षा चांगलं कराल. रोज चार हजारांवर शब्द लिहिणं, पत्रकारिता करणाऱ्या इतर संस्थांचं पब्लिक ऑडिट करणं, त्याचं विश्लेषण करणं, हे त्याच्या पुढच्या टप्प्यांचा भाग म्हणून होत राहातंय हे त्याने सांगितलं. त्यासाठी फॅक्ट सही होने चाहिये, इल इंटेन्शन ना हो इतनाही, ही आपल्या कामाची गरज म्हणूनही स्पष्ट केली. त्या त्या वेळचे संदर्भ तुम्हाला समजायला हवेत. त्यासाठी तुमचं वाचन असेल, तर तुम्हाला तुमचं काम अगदी सहज पुढे नेता येतं. कोणत्याही भाषेत पत्रकारिता केलीत, तरी तुम्ही कायम यशस्वी राहता. तुम्ही जे काही लिहिणार आहात ते सगळं पब्लिकमध्ये येणार आहे. अनेकदा तुम्ही अस्वस्थही होऊ शकताय. म्हणून ते लिहिण्यापूर्वी त्यासाठीचे फॅक्ट शोध, त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. ते मी स्वतः करतो, हे सांगायला तो विसरला नाही.

अगदी हसत- खेळत हे वातावरण खुललं होतं. आपल्या एचआरकडे बघत तो म्हणाला, ते व्हिजिटिंग कार्ड वगैरे छापणं खूपच सोप्प आहे, यांच्यासाठी तर ते रोजचं काम आहे. त्यात काय आज माझं छापलं, तसं ते उद्या कोणा दुसऱ्याचंही छापून देतील. काळ सरत जाईल, तसं माझ्यावरूनही लोकांचं लक्ष हटेल, पण जर मला आता अँकर बनवलंच आहे तर त्याचा मी फायदा कसा घेतोय हे महत्त्वाचं आहे. तसं नको असेल, तर हार्डवर्क हवंच. अनेकजण माझ्यापेक्षाही जास्त क्षमता असणारे होते, मात्र ते भरकटले. एक अपना पॅशन बना लिजिए, हमें ये पढना है, और पढते जाईये. और दुसरा वो टॅक्सवॅक्स क्लिअर रखीये, रिश्तेदार वगैरा फोन करते है कामके लिए, तो थोडा दूर रखिए. मैं उनसे कम मिलता जुलता हूँ.हे सगळं तो अगदी सहज बोलत गेला. प्रश्न येत गेले, रविश उत्तरं देत गेला. अजिबातही अवघडलेपणा नव्हता. पत्रकारितेच्या स्वरुपाकडे वळताना त्याने नव्या पोरांना दोष दिला नाही. तो म्हणाला, बस आप ह्युमन व्हॅल्युज रखिये. सब बाएसेस दूर रखिये, वो आ जाते है, उसमें आपकी गलती नहीं है. वो आपको समझना पडेगा. मैं लिखके देता हूँ की उसका रिझल्ट झिरो है. आप मंत्री या विधायक के पीए-सीए बन जाओंगे लेकिन जर्नलिस्ट नहीं बन पाओगें. हमारा काम है ऐसे बाएसेस के खिलाफ खडा होना. अगर हम ह्युमॅनिटीमें विश्वास नहीं रखेंगे, तो हमे जर्नलिस्ट किस बातके लिए बनना है. पैसा हमेशा आप दुसरे प्रोफेशनमें कमा सकते हो. एमएलए वगैरा बनीये. खतरों को पहचानो, हम सबको प्रोपगंडासे प्रभावित नहीं होना है. हम जर्नलिस्ट है.शेवटाला अगदी फॉलोअर्सचीही गोष्ट आली तेव्हा गांधी नी आंबेडकर समजून घ्या, त्यांचे फॉलोअर्स व्हा, माझेही नको म्हणत त्याने त्या औपचारिक गप्पा थांबवल्या.  

ही प्रश्नोत्तरं साधारण पंधरा मिनिटं वगैरे चालली. पोरं दिलखुलासपणे हसली, खोचकपणे प्रश्न विचारले, रविशनं दिलेली उत्तरं तितक्याच मोकळेपणाने स्वीकारलीही. त्याच खोलीत पुढच्या गेस्ट्सना जागा करून द्यायची वेळ झाली होती. रिसेप्शनिस्टने येऊन सूचना करून झाली. आम्ही सर्व उठून बाहेरच्या लॉबीत आलो. सर्वांसोबत ग्रुप फोटो झाला. आम्ही परत गाडीकडे निघायला लागतो. मुलं रविशसोबत बोलतच होती. रविशही त्यांच्यासोबत बोलत- बोलत पार्किंगपर्यंत येऊन पोहोचला होता. तिथं पुढचा काही काळ पुन्हा सगळे त्याच्याशी बोलले. रविश कुमार आमच्यासाठी पार्किंगपर्यंत आलाय हे अनेकांच्या समजण्यापलीकडे गेलं होतं. पण ते कदाचित त्याच्यासाठी तितकंच स्वाभाविक होतं. त्याने सगळ्यांना पत्रकारितेतील त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. पोरांनीही अगदी हसत हसत त्या स्वीकारल्या. हे पाहणंही सुखावणारं होतं. एखाद्या पत्रकारावर नवी पोरं इतका कमालीचा विश्वास टाकू शकतात, हे त्यातून स्पष्टच दिसत होतं. पत्रकारांविषयीचं काहीसं अविश्वासाचं वातावरण, एकमेकांमधील टीका-टिप्पणीचं भांडवल यात आता काय ते नवं नाही. मागे एकदा एका लेखाच्या निमित्ताने लिहिलं होतं. पत्रकारांविषयीचं ते तसलं वातावरण, त्यांच्यातील ते वैचारिक वा तात्त्विक वा ऑफिशिअल संघर्ष हे लोकशाहीच्या उर्वरीत स्तंभांना कधीही हवेच असतील. कोणाला वाटणारे की पत्रकार असा इतर स्तंभांएवढा असा इतका मोठा व्हावा, नी त्यालाही असा मोठा सन्मान मिळावा ना. त्यांची उणीदूणी निघतील तेवढं तिन्ही स्तंभांसाठी भारीच. आज मात्र गंमतच झालीये. पत्रकार मोठा झालाय. ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण मागच्या काही वर्षांमधली ही तशी पहिलीच वेळ ठरणारे, अनेकांसाठी. माझ्यासाठी हे पत्रकार मोठं होणं जरा जास्तच महत्त्वाचं आहे. रविशचं पुरस्कारासाठी अभिनंदन वगैरे त्याच्यापर्यंत कधी पोहोचेल तेव्हा पोहोचो, पण पत्रकारिताही मोठी होऊ शकते, हे सकारात्मक कृतीतून दाखवून दिल्याबद्दल त्याचे खूप जास्त आभार.