शुक्रवार, २१ जून, २०१३

पै...पैलवानाचा



पै.’ म्हणजे माझ्या लेखी पैलवान. पै. आणि त्याच्यापुढे एखादं नाव असलेले अनेक फ्लेक्स मी जाता-येता पाहत असतो. त्या फ्लेक्समध्ये पै. च्या पुढे असलेल्या नावात बदल होत असला, तरी त्याच्यापुढचं फोटोमधलं सन्माननिय व्यक्तिमत्त्व एकंदरीत भारदस्तच असतं. त्यामुळं मला पै. स्टँड्स फॉर भारदस्तपणा,’ असंच फीलिंग येतं. पै.’ म्हणजे कोणी पहेलवान म्हणतं, तर कोणी पहिलवान. मला आपलं पैलवान हा पल्लेदार शब्दच जास्त आपलासा वाटतो. त्यातली ती पै वर जोर देऊन उच्चार करण्याची गावाकडच्या लोकांची लकब एकच नंबर असते. त्यामुळंच न राहावून मग आपल्या नावापुढंही असं पै. लावावं असं वाटून जातं. पै. योगेश बोराटे.

असं हे आत्ता आत्ताच वाटायला लागलं असंही नाही, ते आकर्षण बालपणापासूनच आहे. आम्ही भुसावळला गेल्यावर पहिल्याप्रथम टाक गल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहायचो. तिथं तीन खोल्यांचं घर होतं. त्यातल्या मधल्या खोलीत भींतीवर अगदी वरच्या बाजूला बजरंग बैठकीतलं मारूतीचं
पोस्टर चिकटवलेलं होतं. ते पोस्टर माझ्या वडिलांनी चिकटवण्याचा संबंध नसावा. कारण ते त्यावेळी दत्ताचे गुरुवारचे उपास करायचे. दत्ताचे भक्त आणि त्यातल्या त्यात त्यांची उंचीही तशी कमीच असल्याने एवढ्या उंचीवर लावलेलं बजरंगबलीचं पोस्टर त्यांनी लावलेलं नसावं, असा माझा तर्क आहे. त्यामुळं कदाचित आमच्या अगोदर त्या घरात जे कोणी राहत असेल, त्यांनी हा प्रताप केलेला असावा, असं वाटतं. त्या पोस्टरमध्ये बजरंगाची एकूणच छबी पाहून मलाही तशीच बैठक मारावी असं वाटायचं. त्या बैठकीला पूरक म्हणून मी खेळण्यातली गदाही अनेकदा सोबत ठेवायचो. चिखलाच्या गाड्या करून त्याच फिरवायचा खेळ करेपर्यंत निदान मला ती गदाच सर्वात प्यारी होती. नंतरच्या टप्प्यात मग बजंरगासारखीच तब्येत असावी हे वाटणं ओघाओघानी आलंच.

गल्लीत राहायला असताना अमित सोबत असायचा. अमित माझ्यालेखी माझा बॉडी बिल्डरच होता. तो आणि मी चौथीपर्यंत तु. स. झोपे शाळेत सोबतच होतो. त्याची तब्येत एकदम तगडी. व्यायामही चालायचा. आता तो डॉक्टर झाला असला, तरी त्याचा जड व्यायाम अजूनही सुरूच असावा. त्याच्यासोबत शाळेत जाणं-येणं. इतरांच्या खोड्या काढल्या, तरी सावरून घ्यायला तो असायचा. त्यामुळं कधी अडचण येत नव्हती. हाणामारी झालीच, तरी सोडवायला तो धावून यायचाच. बरं, तसं आम्ही दोघंही वर्गात इतरांच्या तुलनेत हुशार टाळक्यांपैकी असल्यानं मास्तरचा मारही पडला नाही कधी. शाळेत लंगडी खेळताना धिंगाणा झालाच, तर खेळणं आवरल्यावर एखाद्याची कॉलर पकडून मग अमितला हाक मारली तरी कार्यक्रम निपटायचा. त्यामुळं शाळेत पै. होण्यापेक्षा असा बिल्डर सोबत असण्यावर भागलं होतं. त्यामुळे तु. स. झोपेमध्ये मी तसा पै. बनलोच नाही.  

पाचवीपासून भुसावळ हायस्कूलला अडमिशन घेतलं. हायस्कूलसमोर भरपूर मोठ्ठं पटांगण. दोन खो-खोची मैदानं. मैदानाच्या कडेला एका बाजूनं पटांगणाच्या रुंदीएवढी व्यायामशाळा. मला त्या शाळेत अडमिशन घेतल्यावर हे मैदान आणि ती व्यायामशाळाच भावली. पाचवी ते दहावीच्या वर्षांमध्ये शाळेत खो-खोचाच नाद जास्त लागला. बर, या शाळेत अमित सोबत नसला, तरी तशीच पै. कॅटेगिरीतली सात-आठ दहा दोस्त मंडळी मिळाली. हे हायस्कूल तसं निवांत होतं. भिल्ल, बैलम, भोईंची तुफान भरती असलेलं हे हायस्कूल. तिथं बोराटे आडनावाला अल्फाबेटिकली शेजार मिळाला तो याच आडनावाच्या दोस्तांचा. तब्येतीला अडदांड. एकेका वर्षात किमान दोनदा हजेरी लावलेली ही दोस्तमंडळी वयाने माझ्यातुलनेत मोठीच होती. तब्येतही तशीच. बर ही मंडळी वर्षभर अभ्यासाच्या नावानी शिमगाच करायची. गृहपाठ करणे म्हणजे आमच्या सर-मॅडमवरचे उपकार. हे उपकार नाही केले, तर वर्गात मास्तरनी बडव-बडव बडवताना झालेली वर्गातल्या इतरांची करमणूक ही त्यांच्या लेखी परोपकारासारखीच. त्यामुळं अभ्यासाचं तसं काही सोयरंसुतक नसलेली ही दोस्तांची फौज परीक्षा जवळ आली, की आमच्या दिमतीला हजर असायची. 

मला आठवतंय तसं, पाचवीच्या परीक्षेपासून या सर्व दोस्तांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. परीक्षेमध्ये ह्यांची अपेक्षा काय, तर रिकाम्या जागा, जोड्या लावा आणि एका वाक्यात उत्तरं सांग. माझ्याकडून त्यांच्यापैकी एकापर्यंत जरी ही माहिती गेली, तर ती बाकी सगळ्या भाऊबंदकीला पोचणार याची शाश्वती त्यांच्यातला एक जण कुणीतरी घ्यायचं. माझ्याकडून माहिती घ्यायची जबाबदारी मात्र बैलमवर. शांताराम रामा बैलम. त्यावेळी माझ्या निदान दुप्पट उंचीचा. मी उत्तरपत्रिका लिहित असलो, तरी तो माझ्यामागून वा पुढून सहज ती पाहू शकत असे. वर्गाच्या शेवटच्या लायनीत जर नंबर आले, तर त्यानं कमवलंच, तो पलिकडच्या लायनीतूनही माझा पेपर वाचू शकत असे. त्याच्या पाठोपाठ मग सगळी भोई गँग ऐश करायची. आणि ही सगळी गँग माझी दहावी होईपर्यंत माझ्यासाठी बॉडी बिल्डरची फौजच असल्यासारखी होती. वर्गात भांडणं करायची वेळ आलीच किंवा खो-खोच्या मैदानावर कुणाशी वाजलं तर ह्यांच्यातला एखादा तरी भांडणं सोडवायला यायचा. त्यानी समोरच्याला त्यांच्या ग्लुसरीपैकी एखादी गावरान शिवी हासडली की झालं. समोरचा जो कोणी असे, तो आपला गप गार. मी ह्या दोस्तांसाठी चिंगळीच होतो. ते घ्यायचे सांभाळून. त्यांच्यामुळंच मग या हायस्कूलला असेपर्यंत अगदी समोर असलेल्या व्यायामशाळेकडे मी व्यायाम करायचा म्हणून फिरकलो नव्हतो. एक-दोनदा गेलोच, तर तो आखाडा कसा असतो ते बघायला आणि शांत्या भोई वजनं उचलतो की नुसत्याच अमुक उचललं नी तमुक उचचलं ते बघायला. झालं. तिथंही आमची पैलावानकीची स्वप्नं स्वप्नंच राहिली.

कॉलेजलाईफ म्हणजे बिइंग ए सायन्स स्टुडंट, अभ्यासाकडे लक्ष देणे. टवाळक्या न करता शांततेत पुस्तकात डोके घालणे, कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज करणे. मी त्यात कधी रमलो नाही. अभ्यासातला फर्स्ट क्लास कायम सांभाळून बाकी सगळं करायचं ते केले. सीनियर कॉलेजला आल्यावर मात्र पैलवानकीच्या स्वप्नांनी पुन्हा जोर धरला. पुन्हा मग हायस्कूलसमोरच्या व्यायामशाळेतला आखाडा आठवला. त्या आखाड्यासमोर आणि फक्त तेल लावून मालिश करून आखाड्यात उतरणाऱ्या तिथल्या भोई-भिल्ल दोस्तांसमोर कॉलेजमधली जीम फिकी वाटली. मग रोज सकाळी हायस्कूलसमोरच्या आखाड्यात जायचं ठरलं. पहिल्याच दिवशी जामी पैलवान नावाचा दोस्त भेटला. सुरुवात करतोये तर जाऊन बजरंगाला नमस्कार कर, वर्गणी भर आणि लाल मातीत उतर म्हणून सांगितलं. मीपण वस्ताद सांगतोये तर करायला पाहिजे, म्हणून सगळे सोपस्कार आटोपून आखाड्यात उतरलो. सुरुवात झाली ती लोखंडी खोऱ्याने आखाड्याची माती मोकळी करण्यापासून, पण पहिल्याच दिवशी लोड नको म्हणून जामी वस्तादने अर्धाच आखाडा खणायला लावला. तेवढ्यातच चक्कर आल्यासारखं झालं. खोरं बाजूला ठेवून लाल मातीत लोळूनच पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवसापासून खोऱ्यानी ओढनं सोडून दिलं. 

त्यानंतर चार-सहा दिवस गेले असतील. वजनं उचलायला सुरूवात झाली होती. आता बेंचवर झोपून वजनं उचलायची ठरलं. तिथं एका लायनीत चार बेंच मांडले होते. लायनीने तिसरा बेंच तेव्हा रिकामा होता. त्या बेंचच्या दोन्ही बाजूनी असलेल्या दोन उभ्या खांबावर आडव्या रॉडनं बरोबर वजनं मांडलेली होती. मी नवशिक्या गडी. या रॉडच्या दोन्ही बाजूनची वजनं समान मापानी काढायची असतात हे माहितीच नव्हतं. मी आपला शांततेत गेलो. वजनं आपल्याचानी पेलवणार नाहीत हे लक्षात घेतलं आणि वजनं कमी करायची ठरवलं. एका बाजूच्या प्लेटला हात लावला आणि ओढली रॉडवरून बाहेर. एका बाजूचं वजन कमी झाल्यानं रॉडचा बॅलन्स गेला. मला काही कळायच्या आत तो रॉड माझ्या समोरून असा उंच जात दुसऱ्या बाजूला आदळला. बर तेवढ्यावरच थांबलं नाही. रॉडला मिळालेल्या गतीमुळे तो पलिकडच्या बेंचवर गेला. तिथं व्यायाम करत असलेला गडी सावरायच्या आत हा रॉड त्याच्या मानेजवळ गेला. दुसऱ्याने तोपर्यंत धरला म्हणून कमवलं. वजनं पडल्याच्या आवाजाने सगळे माझ्याकडे बघायला लागले होते. ज्याच्या मानेजवळ तो रॉड गेला होता तो तर, अर का रे भो. नवा आला का तू, कोन्ह सोडलं रे याले आतमंधी, असं म्हणत उठला. मी म्हटलं झाला आता कार्यक्रम. पण जामी पैलवानानी आवरलं. आम्ही दोघं बाहेर आलो. शाळेच्या कट्ट्यावर बसलो. त्यानी मला समजवलं, अरे छोटे ऐसा नी करनेका. मेरेको आवाज देने का. मै बताता था ना तेरेको, म्हणत त्याने छान माहिती दिली. ती शेवटचीच. कारण त्यानंतर आपल्या स्वप्नाचा इतरांना त्रास नको, म्हणून मी तिकडं जाणं थांबवलं. घरच्या घरीच व्यायाम सुरू केला.

आता व्यायामशाळाही नाही आणि घरचा व्यायामही नाही. पै. व्हायचं स्वप्न मात्र अजूनही ताजं आणि तेवढंच टवटवीत वाटतं. आज वजन केलं. गेल्या वेळच्या तुलनेत पाच किलोंनी जास्तच भरलं. आता ते कमी करायचं म्हणजे व्यायाम करणं आलं. आणि व्यायाम म्हटलं की माझ्या या पैलवानकीच्या स्वप्नांना पुन्हा कोंब फुटतो. बघू आता काय होतं ते. व्यायाम सुरू झाला तरी बास.   

बुधवार, १९ जून, २०१३

सोबनी...


सोबनी... म्हटलं तर तसा निरर्थकच शब्द, पण आमच्या दादांच्या लेखी या शब्दाला खूप महत्त्व आहे. महत्त्व यासाठी, की सोबनी बनवणं हा त्यांचा छंद आहे. सोबनी म्हणजे जेवताना ताटाला लावण्यासाठीचं वटकन. अजून थोडा विस्तृत अर्थ सांगायचा तर, ताटामध्ये वाटी नसताना पातळ भाजी घ्यायची असली, तर त्या भाजीमुळे चपाती वा भाकरी भिजू नये म्हणून भाकरीच्या बाजूनं ताटाखाली जी वस्तू ठेवतात, ती भानगड. सोबनी आणि वटकन हे दोन्ही शब्द तसे गांवढळचं. इथं पुण्यात एक - दोघांना तुम्हाला हा शब्द माहिती आहे का, असं विचारून पाहिलं, पण त्यांना काहीच कल्पना आहे असं दिसलं नाही. त्यामुळे या दोन्ही शब्दांचा, त्यातून निघणाऱ्या अर्थाचा आणि पुन्हा त्यातूनच अशी भन्नाट वस्तू तयार करण्याच्या आमच्या दादांकडे असणाऱ्या कलेचा युनिकनेस समोर आला. माझ्यासाठी तो नक्कीच महत्त्वाचा आहे.

सोबनी आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आक्का-दादांनी मलवडीवरून पुण्याला येताना एका पिशवीमध्ये आठवणीने पाच-सहा सोबन्या भरून आणल्या होत्या. मागे एकदा मलवडीला गेलो, त्यावेळी दादा नेहमी सोबन्या ज्या ठिकाणी ठेवतात, त्या ठिकाणी त्या शोधण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच त्या सापडल्या नाहीत. मी काहीतरी शोधतोये हे लक्षात आल्यावर दादांनी, काय शोधतोयेस,’ म्हणून विचारलं होतं. तसं विचारल्या विचारल्या मी सोबनी असं उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्यांनी आत्ता कुटल्या रं आल्या, नेल्या असत्याल कुनीतरी,’ म्हणून सांगितलं होतं. त्यालाही दोन-चार महिने उलटून गेले. पण आता येताना ते आठवणीने त्या तयार करून घेऊन आले होते. म्हटलं तर माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्टच आहे ते. भुसावळलाही अश्या एक-दोन सोबन्या मी घेऊन गेलो होतो. पुण्यात घरी अशा सोबन्या आणायच्या माझ्या मनात होतंच. कारण इथं पातळ भाजी असली, की ताटाखाली घ्यायला काहीतरी शोधावं लागायचं. मग कधी सांडशी, कधी मिठाच्या डबीचं छाकण, तर कधी तसंच काहीतरी. आता अशी शोधाशोध करावी लागणार नाही.


सोबन्यांसोबत आमच्या लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. सोबनी, मोठ्या दगडी गोट्या, विटी-दांडू वगैरे वगैरे. उन्हाळ्याच्या सुट्टीत भुसावळहून मलवडीला गेलं, की दादा यापैकी काहीतरी तयार करत बसलेले मी तरी अनेकदा पाहिलं आहे. कधी आम्हा पोरांपैकी कुणीतरी मागितलं म्हणून, तर कधी निवांतपणात हाताला काही तरी काम हवं म्हणून ते असं काही तयार करायचे. त्यातल्या त्यात सोबनी मला जास्तच आवडते. त्याचं कारणही तसंच आहे. दादा लाकडाच्या फळ्यांच्या छोट्याश्या तुकड्यापासूनही अशी सोबनी बनवतात, तुकडा वाया जाऊ न देता. बोले तो टाकाऊतून टिकाऊ. आणि तरीही या सोबन्या दिसायला एवढ्या आकर्षक आणि सुबक दिसतात, की ताटाला लावायला म्हणून जर ती आपल्यापुढे सरकवली, तर ती ताटाखाली लावण्याअगोदर आपण ती निरखून नक्कीच पाहणार.

दादांची सोबनी तयार करण्याची प्रोसेस अगदी साधी-सोप्पी होती. म्हशीसाठी वैरणीचे बिंडे तयार करून झाल्यावर दादा शक्यतो त्या वैरणीच्या पाटीजवळून उठत नसत. पाटी म्हणजे मोठ्या आकाराचं टोपलं. हातातली कुऱ्हाडही शक्यतो खाली ठेवण्याच्या फंदात पडत नसत. तसंच जवळ पडलेल्या लाकडांच्या तुकड्यापैकी एखादा उचलायला आणि करायची सुरुवात. दादांच्या सोबन्यांना आकार आणि त्यांच्या कडा मशिनवर लाकडू कट करून आणल्यावर जश्या दिसतील तश्या दिसतात. वैरण तोडताना लांब धरलेली कुऱ्हाडीच्या दांड्यावरची त्यांची पकड, हा लाकडाचा तुकडा उचलतानाच त्या कुऱ्हाडीच्या लोखंडी पात्याच्या अगदी जवळ आलेली असायची. त्यातूनच मग लाकूड अगदी बेतानी तोडनं, त्याला हवा तसा आकार देणं, गरज पडली, तर ते कोपऱ्या-कोपऱ्यानी तासनं असं सगळंच मग जमायला सुरुवात व्हायची. अगोदर स्लोप दिलेला लांबट उभट चौकनी तुकडा पाडायचा. नंतर त्याच्या कडा तासायच्या. निमुळत्या बाजूवर मध्येच त्रिकोणी काप पाडायचे की झाली सोबनी तयार. या सोबन्या तारेमध्ये गुंफून ठेवण्यासाठी गरज पडलीच तर कुठेतरी एका बाजूने त्याला छिद्र पाडायचं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या बंडीच्या बटव्यामधून किमान एखाद-दोनदातरी तंबाखू खाल्लेली असणार.

दादा बसल्या बसल्या अशा अनेक सोबन्या बनवतात. आता वय झाल्यामुळं सोबन्या बनवायचं प्रकरण बरंच कमी झालंय. त्यामुळेच मलवडीला घरी गेल्यावर आता सोबन्या शोधाव्या लागतात. नाही तर अगोदर घरात अनेक ठिकाणी सोबन्या पडलेल्या दिसायच्या. कुणी बाहेरचं आलं आणि त्यांनी सोबन्या निऊ का,’ म्हणून विचारलं तरी आक्का-दादा कुणाला नको,’ म्हटल्याचंही मला आठवत नाही. दादा म्हणणार, न्ह्या की. त्यात काय एवढं, पुन्हा करीन. त्याला किस्ता एळ लागतो. आता तसं नाही. मध्यंतरी त्यांची लाडकी म्हसही विकून टाकली, त्यामुळे तिच्यासाठी वैरण-बैरणही तोडायची गरज नाही आता. एकंदरीतच, त्यांचा कुऱ्हाडीवरचा हातही हलका झाला असणारे. पण तरीही त्यांनी इकडं येताना या सोबन्या आणल्या. मी मागितल्या होत्या, हे आठवणीत ठेऊन आणल्या. माझ्यासाठी हिच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी आणलेल्या त्या सोबन्या सध्या आम्ही घरात वापरायला काढल्या आहेत. त्या पाहिल्या-पाहिल्या त्यांचा आखीव-रेखीवपणा आणि त्यातूनच दिसणारी दादांची कलाकुसर समोर आल्यावाचून राहत नाही आणि मग आपसूकच आक्का-दादांची आठवणही थांबत नाही. थांबवावी असं वाटतही नाही...  

बुधवार, १३ मार्च, २०१३

विस्तवापलिकडलं वास्तव


रात्रीच्या साडेअकरा झाल्या असतील. नदीकडं जाणाऱ्या रस्त्यावर त्यावेळी तसं कोणीच नव्हतं. अपवाद होता तो नदीच्या दिशेने निघालेल्या त्या एका गाडीच्या मागनं जाणाऱ्या अनेक गाड्यांचा. नदी जवळ आल्यावर एका ठिकाणी ती पुढची गाडी अचानक थांबली. त्या गाडीच्या मागोमाग माझी गाडीही मी थांबवली. रस्त्याची अवस्था तशी खराबच होती. बरं, रस्त्यावर लाइटही नव्हते. अचानक काही अडचण नको म्हणून मी गाडीची लाईट सुरूच ठेवली. माझ्या शेजारी थांबलेल्या गाडीवाल्यानंही त्याच्या गाडीची लाईट सुरूच ठेवली. समोरचं दृष्य मी त्या उजेडातच पाहात होतो. पाच- दहा लोकं समोर आली. त्या दोघांसोबत अजून तिघा-चौघांनी खांदा देत गाडीतील निर्जीव देह खाली आणला. रस्त्यावर ठेवला. एक – दोन मिनिटं थांबल्यावर पुन्हा राम बोलो भाई राम म्हणत उचलला. गाडीत ठेवला. गाड्या निघू लागताच मी शेजारच्या गाडीवाल्याला विचारलं, हे काय होतं,’ तो म्हणाला, शेवटचा इसावा दिला ना भो. आता चाला डायरेक नदीवर.
 
माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. मी त्या दिवसापर्यंत कधीही कुणाच्या अंत्ययात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत गेलो नव्हतो. त्या दिवशी गेल्यावर शेवटच्या विसाव्याची ही नवी गोष्ट समजली. जिथं हा विसावा दिला, तिथून गजानन महाराजांचं मंदिर अगदी स्पष्ट दिसण्यासारखं होतं. म्हणूनच बहुतेक त्या ठिकाणीच असा विसावा देत असतील. गाड्या पुढे निघाल्या. त्यांच्याच सोबतीनं नदीवर गेलो. तसा नदीचा हा भाग माझ्यासाठी नवा नव्हता. दोस्तमंडळींसोबत अनेकदा त्या भागातून नदीवर जायचो- यायचो. सहजच. तसं काही खास कारण नसायचं. अनेकदा सकाळी फिरायला म्हणून, कधीतरी संध्याकाळीसुद्धा टाईमपास करायला म्हणून जायचो. घरापासून हा स्पॉट तसा इतर ठिकाणांपेक्षा खूप जवळ होता आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्हाला सतवायला कोणी यायचा प्रश्न नसायचा. अशुभ ठिकाण होतं ना ते, म्हणून. पण तिथली शांतता आणि मोकळी हवा मला खूप आवडायची. म्हणून मी आपला जायचो चक्कर मारायला. 

तिथं एक तर कुणालातरी अगोदरच जाळलेलं असायचं, किंवा नंतर तरी आणायचे. पण, मी असा थेट एखाद्याच्या अंत्ययात्रेत जाण्याचा तसा संबंध आला नव्हता. या वेळी तो ही आला. ज्या ओट्याच्या कट्ट्यावर मी अनेकदा बसलो होतो त्या कट्ट्याच्या परिसरामध्ये सगळे जमा झाले. लाकडं रचायची तयारी सुरू झाली. पाणी आणण्यासाठी एकाने त्याच्याकडे मडकं दिलं. नदीवर जाऊन आंघोळ करून ते मडकं भरून पाणी आणायला सांगितलं. एवढ्या थंडीचं नदीचं पाणी अंगाला लावून घेण्याच्या विचारानंच माझ्या अंगावर शहारे आले. तो शांत होता. हो म्हणाला आणि निघाला. त्याच्यासोबत जायचं म्हणून मीही निघालो. त्याच्यासोबत चालता-चालता तो नेमका काय विचार करत असेल त्यावेळी, याचा अंदाज लावत होतो. अंदाज लागत नव्हता. एका बॅटरीच्या प्रकाशात त्याला त्याच विचारांमध्ये रस्ता दाखवत दाखवत नदीच्या मध्यापर्यंत पोहोचलो.

नदीचं पात्र तसं कोरडंच होतं. त्यामुळं बऱ्याच आत गेल्यावर एका ठिकाणी साठलेल्या पाण्याचं एक डबकं लागलं. डबकं मोठ्ठ होतं. त्यामुळे त्याला मडकं भरून घेण्याएवढं पाणी मिळालं. त्याला आंघोळ करायची होती. सोबतच्यांनी त्याला अंग ओलं करून घेण्याचा सल्ला दिला. त्याला सुचेना काय करावं नेमकं ते. सोबतच्यांनीच मग त्याच्या अंगावर तो पूर्ण भिजलेला दिसेइतपत पाणी टाकलं. डोकं ओलं केलं. पाण्यानी भरलेलं मडकं परत त्याच्याकडे दिलं. आम्ही सगळे परत त्या कट्ट्याच्या दिशेने निघालो. त्या दिशेनं पाहिलं, तर काठावरच्या लोकांच्या काळ्या प्रतिमा अन त्यांच्या पाठीमागे लख्ख प्रकाशामध्ये लाकडं रचण्याची सुरू असलेली लगबग जाणवत होती. त्याच्यासोबत आलेलो आम्ही सगळे त्याला घेऊन त्या लगबगीच्या दिशेने निघालो.

आम्ही पोहोचेपर्यंत निम्म्याच्या वर लाकडं रचून झाली होती. गेल्या – गेल्या त्याने ते मडकं तिथं जवळच ठेवलं नी तिथंच उभा राहून ते सगळं बघू लागला. कुठूनतरी उसउस ऐकू येत होतीच. किती चांगला- किती वाईट, कसा गेला, काय राहिलं- काय पाहिलं याचा सगळा लेखाजोखाही मांडला जात होता. मडक ठेवल्यानंतर काही काळाने तो कुडकुडायला लागला. मी आणि माझ्यासोबतच्या आणखी एका मित्रानी त्याला चितेच्या थोडं जवळ नेलं. आम्ही ज्या चितेसाठी आलो होतं, ती रचताना मदत करणं तिथून शक्य होतं आणि त्याच्या अलिकडची जी चिता जळून झाली होती, तिच्या उरल्या-सुरल्या विस्तवाची उबही त्या ठिकाणी जाणवत होती. त्याला तिथं उभं केल्यावर त्याचं कुडकुडणं जरासं कमी झालं. गेल्यापासून त्याला धीर देण्याची इच्छा अनेकदा झाली होती, पण मलाच धीर एकवटता येत नव्हता. त्या विस्तवाची थोडी उब मिळाल्यावर मीही तो एकवटून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं माझ्याकडे पाहिलं. नजरेला नजर देण्याची माझी हिम्मत झाली नाही. बोलणं तर शक्यच नव्हतं. शांतपणे चितेकडे पाहात राहिलो. 

चिता रचून झाली होती. शेवटची लाकडं त्या दोघांच्या हातात देण्यात आली. त्या दोघांनीही ती नीट मांडली. बाकीचे सगळे दूर हटले. ते दोघं तिथंच होते. त्यांचे हुंदके अनावर होत होते. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. माझ्या मनातल्या आठवणीही काही केल्या थांबत नव्हत्या. चितेला अग्नी देण्याच्या बरोबरीनेच त्या आठवणींच्या वणव्यानेही पेट घेतला. आग भडकली. मध्येच ती तडतडत होती. कुणीतरी आगीत मीठ टाकत होतं. ते टाकल्यानंतर आग कशी भडकते, ते समोर दिसतं होतं. आगीत मीठ टाकण्याचं काम सुरू होतं. पण त्याला या वेळी कोणीच थांबवत नव्हतं. एरवी तसं कोणी केलं, तर मध्येच ते थांबवू वाटणाऱ्या माझ्यासारख्याच अनेकांनी त्यावेळी तशीच भूमिका घेतली होती. मीठामुळे भडकलेली आग, आगीच्या धुरासोबतच उंच उंच उडणाऱ्या ठिणग्या हवेत विरून चालल्या होत्या. त्या आगीचाही पुन्हा थोड्या वेळाने विस्तव होणार होता, याची जाणीव होत होती. विस्तवातून आग... आगीचा पुन्हा विस्तव... जगण्या मरण्याचं वास्तव पटवून देत होती. शेवटच्या विसाव्यानंतर विस्तावातून जाणवलेलं हे वास्तव भयाण करत होतं त्यावेळी. त्यानंतही आणि कदाचित यापुढेही...