रविवार, ३० जुलै, २०१७

वाचनप्रपंचाच्या निमित्ताने...

मी तसं खूप काही वाचत नाही, तरीही एक प्रश्न पडतोच. म्हटलं तर तसा खूपच बेसिक प्रश्न असावा हा, मी का वाचतो? उत्तरही तितकंच साधं- सोप्पं. वाचायला मिळतंय म्हणून. पण तरीही, का वाचतो? खूप दिवसांपासून या प्रश्नाच्या उत्तराविषयीची मत-मतांतरं डोक्यात सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिपोर्टिंगचे दिवस वाचणं सुरूए, ते आता शेवटच्या टप्प्यात आलंय. कामाच्या निमित्ताने रिपोर्टिंग सुरू केल्यावर ते एकदा हाती घेतलं होतं. आता पुन्हा जवळपास सहा वर्षांनंतर, तेच शिकवायला सुरुवात केल्यावर ते पुन्हा एकदा वाचून काढावं म्हटलं. त्या आधी राजधानीतून वाचून पूर्ण केलं. बातमीमागची बातमी नावाचं एक पुस्तक चांगलं आहे असं समजल्यावर तेही घेऊन आलोय. तेही वाचायचंय. का वाचतोय म्हटलं तर, सवड मिळाली की घ्यायचं वाचायला, बोअर झालं की घ्यायचं वाचायला, जास्तच बोअर झालं की ठेवायचं बाजूला. खूप जण सांगतात म्हणून वाचायचं, वाचणं चांगलं असतं म्हणून वाचायचं वगैरे वगैरे. नेमकं उत्तर तसं काही केल्या सापडत नाही. तरीही मी वाचतो. उत्तराविषयीचा विचार करायला लागल्यावर वाचनाविषयीच्या या प्रश्नाच्या उत्तरानं मला अनेकदा अगदी बालपणात नेऊन पोहोचवलं. कदाचित त्याचं उत्तर लहानपणापासूनच लागलेल्या- लावलेल्या सवयींमध्ये दडलेलं असावं म्हणून.  

भाऊ, माझे वडिल बाहेरगावी गेल्यावर आमच्यासाठी म्हणून नेहमीच पुस्तकंच आणायचे. ते बाहेरून आल्यावर खाऊ म्हणून हाती मिळायची ती पुस्तकंच. वाढदिवसाला पुस्तकं, परीक्षेत चांगल्या मार्कानं पास झालं की पुस्तकं, काही नवं चांगलं केलं की पुस्तकं, पुस्तकं नी पुस्तकंच. सुरुवातीच्या टप्प्यात गोष्टींची पुस्तकं, मग अभ्यासाला जोड देऊ शकतील अशी पुस्तकं, सुरुवातीची मराठी नी मग हिंदी पुस्तकं, हिंदी कथासंग्रह असलं काही- काही वाचायला मिळालं. मिळालं म्हणण्यापेक्षा ती वाचायची सवय लावली गेली. रोजचा पेपर तर असायचाच. अभ्यासाची पुस्तकं वाचायचा कंटाळा आला की गोष्टींची पुस्तकं वाचून विरंगुळा. जोडीला भरपूर खेळणं. शाळेतली लायब्ररी, तिथली गोष्टींची पुस्तकं. भुसावळचं शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाशेजारचं ते सार्वजनिक वाचनालय नी तिथली पुस्तकं. घरातली पुस्तकं कमी की काय, म्हणून जसं स्वतःची आवड- निवड समजायला लागली होती, तशी या दोन ग्रंथालयांनी ती आवड भागवली. कॉलेजला गेल्यावर लायब्ररीतनं पुस्तकं काढण्यापेक्षा सार्वजनिक वाचनालयातली पुस्तकं आणणं आवडायला लागलं होतं. शेरलॅक होम्स वाचला तो तेव्हाच. प्रवासवर्णनांनीही त्या वेळी मज्जा आणली होती. दरम्यानच्याच काळात सायन्समधनं लक्ष उडायला लागलं होतं. केमिस्ट्रीच्या वर्गात बसल्यावरही डोक्यातली रसायनं कधी-कधी होम्सच्या त्या गूढ कथांमध्ये अडकवायला लागली होती. त्यानंतर जाणीवपूर्वक होम्सला बाजूला सारलं. 



हळूहळू वाचनाविषयीची ती आवडही बदलत गेलीये. सुरुवातीला प्रवासवर्णनं, रहस्यकथा, फार फार तर हलकंफुलकं लेखन वाचायची आवड होती. आताही ते आवडतंच, पण त्या वेळी कधीही हाती न धरलेले जड-बोजड विषय वाचायला लागलो. आधी घरात रोजचा पेपर आला की पानांची वाटावाटी व्हायची. जड ऐवज असलेली मधली पानं आई- भाऊंकडं, मामांकडं जायची. आम्ही दोघं पोट्टे आपलं स्पोर्ट्सचं पान वाटून घ्यायचो. त्यावेळी पेपरही उलटाच वाचायची सवय होती. पेपरची पानं पसरून आपलं सार्वजनिक वाचन चालायचं. क्रिकेटच्या बातम्या पहिल्यांदा, नंतर फ्रंट पेजला काय असेल ते बघणे. त्यावेळी कोणी सांगितलं असतं की पेपर वाचायचीही एक पद्धत असते वगैरे, तर ऐकून सोडून दिलं असतं. आता तसं नाही करता येत. कोणी म्हटलं असतं की पत्रकार होणारेस, तर ही काय भानगड म्हणून विचारत बसलो असतो. आता वाचनाच्या निमित्ताने हा सगळा विचार करतो तेव्हा जाणवतंय, कदाचित त्या वाचनाच्या भानगडीमधूनच आपली गाडी इकडं वळली असावी.

पुण्यात आल्यानंतरच्या काळात साधं- सोप्प लिखाण वाचायच्या निमित्ताने व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांकडे वळलो. साधं- सोप्प अनेक जण लिहित असतील कदाचित. पण माडगुळकरचं आपण का प्रेफर करत असू, असाही प्रश्न पडला. कदाचित त्यांनी लिहून ठेवलंल मनाला जास्त भावतंय असं वाटतं. गावाकडची माणसं, गावाकडची दुनिया ते अक्षरशः शब्दांनीच उभी करतात असं जाणवतं. गावापासून लांब असणाऱ्यांना अशा गोष्टींचं अप्रुप असणारंच की. मीही कदाचित त्यातलाच एक झालो असेन. शंकर पाटील, अनिल अवचटांचं लेखन आवडायचं कारणही कदाचित असंच काहीसं असावं. हे वाचणं आवडीतून व्हायला लागलं. पहिल्या टप्प्यातली सवय जडली नसती, तर कदाचित दुसऱ्या टप्प्यातली निवड समजली नसती. निवड समजल्यानंतर नेमकं कोणाचं काय वाचावं, हे जे आत्ता समजतंय तेही कदाचित समजलं नसतं. त्यामुळंच कदाचित आता तो बालपणातला पुस्तकांच्या खाऊचा टप्पा महत्त्वाचा वाटतोय. वाचनाची ती सवय लावण्यासाठी म्हणून भाऊंनी त्या वेळी जाणीवपूर्वक हाती दिलेली ती गोष्टींची पुस्तकंही महत्त्वाची वाटतायेत.


पुण्यात आल्यावर आपल्याला आवडेल, रुचेल, झेपेल असेच विषय वाचायचे असं सुरुवातीपासूनच ठरवून टाकलं. स्वतःची लायब्ररी करायची, निवडून- निवडून चांगली पुस्तकं गोळा करायची ठरवलं. आता तशी पुस्तकंही जमायला लागलीत. हे सगळं पाहिलं की भारी वाटतं. मागे एकदा असंच घरातल्या पुस्तकांचं छानसं लिस्टिंग झालं होतं. तेव्हा जाणवलं होतं की पुस्तकांचा हा ऐवज म्हणजे आपल्याकडचा खजानाच होत चाललाय. भुसावळला असताना कधी-कधी चोऱ्या-माऱ्यांचा विषय व्हायचा. भुसावळच्या घरात पुस्तकं, पेपर नी कागदाचं भांडवलं खूपच जास्त होतं, आत्ताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. आपल्या घरात चोर आले तर घरात काय सापडणार, तर ही रद्दी असंच भाऊ म्हणायचे. पुण्यातल्या घरात अजून तेवढं ऐश्वर्य नाही. पण, निवडक पुस्तकं गोळा करण्याचा साधारण वेग विचारात घेतला, तर आपलं आपल्यापुरतीचं एक छानसं छोटेखानी ग्रंथालय घरातंच निघू शकेल असं वाटायला लागलंय आता. कदाचित तीच आपली दौलत ठरेल. बघुयात कसं जमतंय ते. एकुणात हा वाचनप्रपंच आपल्याला स्वतःला शोधायला शिकवणारा ठरतोय, आणखी काही प्रश्न नी अशीच आणखी काही उत्तरही देणारा ठरेल बहुदा. 

कॉफी विथ फादर...

साधारण वर्ष-दीडवर्षापूर्वी हे लिहून ठेवलं होतं. ब्लॉगवर पोस्ट करायचं राहूनच जात होतं. त्यावेळचे काही संदर्भ आता थोडे फार बदललेत. पुण्यातल्या पत्रकारितेच्या, फर्ग्युसन कॉलेज रोडच्या, रानडेच्या सोबतीनं असणारं कामाचं स्वरूप मात्र अजूनही तसंच आहे. त्यामुळेच कदाचित असेल, पण अजूनही हे लिहिलेलं तितकंच आवडतंय. म्हणून शेअर करतोय.

कॉफी विथ फादर...
ऑफिस फर्ग्युसन कॉलेज रोडवर असल्यानं वैशाली-रुपाली-आम्रपाली हॉटेलं तशी खूप जवळची. रानडेचा पत्ता शोधतानाच मुळी पहिल्यांदा रुपालीची ओळख झाली. वैशाली त्या ओघानेच समजलं. आम्रपालीचा तपास तसा काहीसा उशीराने लागला. हॉटेलं माहिती झाली, तरी स्वतःहून त्यात आत शिरायचं डेरिंग अगदी अलिकडच्याच काळात केलं. नाहीतर आम्ही आपलं त्रिवेणी वा रानडेच्या कँटिनमध्येच पडिक राहणाऱ्यातले. हल्ली मित्र-मैत्रिणींसोबत वैशालीची कॉफी, कधी तरी डोसा इथपर्यंत मजल गेलीये. मित्र मैत्रिणींसोबतच्या या कट्ट्यांवर तसे घरातल्यांसोबत कधी जाणे झाले नव्हते. आजचा दिवस, आजची ती कॉफी त्यामुळेच खास बनली. कॉफी विथ फादर म्हणून.

एकूणातच हॉटेलिंग हा प्रकार आमच्या घरासाठी तसा जवळपास निषिद्धच. भुसावळमध्ये असताना फारसं कधी हॉटेलमध्ये गेल्याचं आठवत नाही. जास्तच वाटलं, तर कधी तरी संगमची पावभाजी. मी पुण्यात आल्यानंतर घरचं खायला मिळत नसल्यानं, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपोआपच हॉटेलिंग सुरू झालं. दुधाची तहान ताकावर नी घरच्या जेवणाची भूक हॉटेलांवर भागवणं सुरू झालं. सुरुवातीला अप्रूप वाटायचं. नंतर ते वाटेनासं झालं. तसंच सुरुवातीला वैशाली- रुपालीत शिरणंही अप्रूप वाटायचं. आता तेही बंद झालंय. आज भाऊंना, माझ्या वडिलांना वैशालीत घेऊन जाताना थोडं टेन्शन आलं होतं. विनाकारणचा खर्च टाळणे, पण आवश्यक त्या गोष्टीवर आणि आवश्यक तेवढा खर्च नक्कीच करणे, हे त्यांचं साध सूत्र आहे. त्यानुसार त्यांचे सगळे व्यवहार चालतात. वैशालीमध्ये हे सहजचं जाणं यातल्या कुठल्याच सूत्रात बसत नसेल. त्यामुळे ते टेन्शन असेल कदाचित. पण आज ते टेन्शन बाजूला सारलं नी गेलो त्यांना घेऊन आत. योगायोगानं आत टेबल मोकळं सापडलं. जाऊन निवांत बसलो. दोन कॉफी सांगितल्या.


ते परत भुसावळला निघाले होते. गाडीला वेळ होता, म्हणून माझ्या ऑफिसकडे आले होते. सोबत दोन बॅगा होत्या. बॅगा म्हणजे एक पिशवी आणि एक बॅग. पिशवी म्हणजे आपली बाजाराला नेतात तशी दोन बंदांची पिशवी. संध्याकाळी बातम्यांचा ओघ सुरू होण्यापूर्वीचा मोजका वेळ होती असल्यानं मी आपलं बाकी कुठे जात बसण्यापेक्षा वैशालीचा पर्याय निवडला होता. आत जाता जाताच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. वेटरने येऊन टेबलखाली ठेवलेल्या दोन बॅगा थोड्या आत, टेबलखाली सरकवायचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनीही त्या बॅगा एकेकाने एकेक करत आपापल्या बाजूला ठेवल्या. तोपर्यंत कॉफी आली. कॉफी पिणं सुरू होतं. मला वैशालीच्या कॉफीची चव काहीशी कडवट वाटते. त्यामुळे मी एरवीच त्यात भरपूर साखर घालून पितो. आज कॉफी सांगतानाच ती गोड करून आणायला सांगितली होती. त्यानुसार वेटरने कपात साखर घालून, त्यावर कॉफी ओतली असावी. कॉफी संपता संपता भाऊंना तळाशी असणारी ती साखर दिसली. कपात साखर तशीच आहे म्हणाले. मी म्हणालो, अहो इथली कॉफी खूप कडू असते म्हणून मी गोड करून आणायला सांगितली होती त्याला. तेही काही बोलले नाहीत.

कॉफी संपत आली होती. त्यांच्याशी गप्पा मारता मारताच विचार सुरू झाले होते. आजपर्यंत कधी असं घरच्यांसोबत या हॉटेलात येऊन बसलेलो नाही. आजूबाजूचं जग या हॉटेलांच्या किश्श्यांमध्ये रमतंय, आपल्याला मात्र त्या हॉटेलांची गोडी कधी लागत नाही.... गोडी लागणं म्हणण्यापेक्षाही इथं येणाऱ्यांपैकी अनेकांसाठीच्या त्या स्टेटस सिम्बॉलच्या भानगडीत अडकणं जमेनासं होतं. सुरुवातीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवायची या हॉटेलांविषयी. रानडेत असतानाच, एका मित्रासोबत या हॉटेलातून जेवायचा प्रसंग आला होता. परत तशी वेळ येऊच नये, याची पुरेपूर काळजी घेत मेसच लावून टाकली. कॉफीच्या घोटांसोबतच्या बिझनेस डिल्स कोणाकोणाकडून ऐकायला मिळाल्या होत्या. कधी कधी सीसीडी वा तत्सम ब्रँडच्या नी या हॉटेलांमधल्या कॉफीच्या तुलनाही ऐकल्या. आपण यात कशातच बसणारे नाही हे जाणवत होतं. तरीही अनुभवण्याची इच्छा तर होतीच. आता ते अनुभवणंही संपलंय. आता काय राहिलंय. आज घरच्यांसोबत, भाऊंसोबत इथं कॉफी पितोय. कधी झालं असतं का असं... जर, तर वगैरे वगैरे.


बिलाचं ते चॉकलेटी पाकिट वेटरनं टेबलवर आणून ठेवलं की जागेवर आलो. पैसे त्यात ठेवले नी ते पुन्हा टेबलाच्या कडेला सारलं. डोक्यात विचार सुरूच होते. म्हटलं, आपलं आपण कधी सेलेब्रिटी होणारंय. असलं जगणं काय सेलेब्रेटींनीच जगायचं असतंय का. लोकं ते कॉफी विथ करन की काय करतात. आपली लोकं आपल्यासाठी सेलेब्रिटींपेक्षाही नक्कीच मोठी आहेत. आपल्या त्या टिनपाट विचारांमुळं त्यांचं सेलेब्रिटी स्टेटस का म्हणून कमी करायचं. कॉफी विथ करन मला तर काय बाबा माहिती नाही. तिथं कुठली कॉफी देतात, तेही काही माहिती नाही. माझ्यासाठी आजची कॉफी, कॉफी विथ फादर बनली ती वैशालीच्या कॉफीमुळं. कडवट घोटांपेक्षा थोड्याशा गोड, तळाला का होईना पण साखरेचा गोडवा देणारी ती कॉफी खरंच माझ्यासाठी स्पेशल ठरलीये. 

रविवार, ७ मे, २०१७

वावटळ

दुपारच्या कडक उन्हाचा अंगार अचानकच गार झाला. खरं तर दुपारनं निळ्या आभाळाचं तेज टक लावून बघणं अवघड बनलं होतं. मघा ते तेज अचानकच झाकोळलं. दक्षिणेकडनं वर आलेल्या काळ्या- निळ्या ढगांच्या पुंजक्यांना पश्चिमेकडल्या, जरा थंडावलेल्या सूर्यानं केशरी कडांनी नटवलं. ते मोकळं निळं आभाळ ढगांनी कधी व्यापलं ते समजेनाच. लांब तिकडं डोंगराच्या कडेनं कुटनं तरी त्या कोरड्या ऊनवाऱ्यात फुफाटा मिसळायला सुरवात झाली. ढगांनी भरलेल्या काळ्या आभाळात अबोली- केशरी रंगाचा खेळ सुरू झाला. लांब तिकडं कुटंतरी एक वावटळ उठलेली दिसली. ढगांचे रंग सरड्यासारखे मधनंच बदलायला लागले. त्या वावटळीनं मनाच्या गाडीला स्टार्टर दिला. आपली गाडी नेहमीसारखीच त्या सोनेरी माळाकडं सुसाट सुटली बघा.    

हितं जमिनीवर वारा गार पडायला लागला. धुरुळा उडवणारा वारा अबोली काळसर आभाळकडं सरकायला लागला. लांब कुठं तरी पावसानं हजेरी लावली. ओल्या वाऱ्यानं ही बातमी हिकडं सिटीत, पहिल्या पावसाच्या दरवळासकट, पोचवली. सिटीत वारं शिरायला लागलं. उंच उंच आभाळात शिरलेल्या अपार्टमेंटच्या गच्च्यांवरनं पोरं-सोरं हात उडवायला लागली. तोपर्यंत अबोली केशरी आभाळ काळवंडायला लागलं. एक मोठ्ठी वावटळ धुळीसकट आभाळात पोचलेली दिसली. यंदाच्या मोसमात पैल्यांदाच वावटळीचं नी ढगांचं सूत जमलेलं दिसलं. काळ्या ढगांमधनं पाढरं- निळं आभाळ इश्टापल्टी खेळायला लागलं. तोवर हिकडं सिटीत घरांची दारं एकामागोमाग एक धडधडली. स्टॉपर नसलेली दारं मोकळी सुटली, नी घरातल्या फरशीवर त्या वाऱ्याच्या कृपेनंच म्हनायची, धुळीतली पावलं उमटायला लागली. गॅलऱ्यांमधनं वाळत घातलेली कापडंही वावटळीनं गुंडाळली. लायटीचे खांब नी डिप्या डुलतायेत तोवर डिपार्मेंट्नं आपलं काम केलं. आधीच अंधारलेल्या घरांमधनं एकदम कुट्ट अंधार झाला. एकसाथ नमस्ते करत घराघरातल्या लायटी विझल्या. परत कधी येणार, हा प्रश्न उभा करून.  

तोवर आपल्या मनमौजी गाडीनं कोरेगाव कधीच सोडलं होतं. उगवतीकडं जाणारा रस्ता पुढंच नेत होता. वर्धनगडाचा घाट वर चढून गेल्यावर खाल्लीकडच्या नी वरलीकडच्या भागातला फरक निसर्गच दाखवून देत होता. खाल्लीकडं लांब लांबपर्यंत पसरलेला माळ, त्याच माळावर तिकडं लांबपर्यंत पसरलेला माणदेश. वरलीकडं कृष्णेच्या पाण्यानं सुपिक केलेली ऊसाची रानं, संपन्नतेचं लक्षणच ते. त्या संपन्नतेकडं पाठ फिरवत आपण उगवतीकडं जात राहातो. उन्हाळ्यातच कशाला, वर्षाच्या कुठल्याही मोसमात तुम्ही हिकडं फिरलात, तर हव्वा तेवढा मोकळेपणा आपल्याला सोबत बांधून घेता येतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबलांबपर्यंत हा मोकळेपणा आपल्याला सोबत करतो. मधली- आधली छोटी गावं, छोट्या- मोठ्या टेकड्या नी एखाद दुसरा डोंगर सोडला, तर मोकळेपणाच तो काय या भागाचं वैशिष्ट्य बनत जातो. 

रस्त्याच्या कडेनं दोन्ही बाजूला माळ. कडेची थोरली झाडं काय ती आपला हिरवेपणा टिकवून. ओढ्या- वगळीच्या बाजूनं वाढलेली करंजं, बाभळी, आंब्याची झाडं काय ती थोडीफार सावली देणार. उरलेल्या उघड्या माळावर नांगरटीच्या खुणा. मातीला ऊन द्यायला म्हणून केलेली नांगरट उन्हाळा असो की पावसाळा, मातीला फक्त ऊनचं देणार. ढेकळात कुटं काळी, कुटं तांबडी, तर कुटं तपकीरी ढेकळं. हिकडं सिटीत तसं ढेकळामधली क्वालिटी कोण शोधायला जात नाही. माळावरली ही मोकळी-ढाकळी ढेकळं बरोब्बर तो फरक दाखवतात. अशा माळातनं, मोकळ्या पडलेल्या नांगरटीमधनंही अशाच एखाद्या तापलेल्या दुपारनंतर एखाद- दुसरी वावटळ उठते. एखाद्या घरावरचं पत्र्याचं पानच हलतं, कुनाची कौलंच पडतात, घराबाहेर वाळत घातलेलं एखाद्या म्हाताऱ्याचं धोतर लांब वावरात ढेकळात काय पडतं, चुलीच्या जळणासाठी म्हणून गोळा केलेल्या बाभळीच्या फण्या पिंजारून रस्त्यावर काय त्या येतात. आसलं सगळं सगळं वावटळीमुळं दिसतं.   

आंब्याचे पाड शोधून दमलेली पोरं माळाकडनं वस्तीकडं सरकू लागतात. जनावरांना तर
गोठ्याचा रस्ता दाखवावा लागतच नसतोय. रानातनं पाठीवर कासरा टाकून सोडलेली जनावरं गोठ्यात दावणीला न बांधताही उभारतात. आंधारलेलं आभाळ कुत्र्यांना काय ते भुकायला मजबूर करतं. घराबाहेरच्या ओसरीवर नक्षत्रांचे हिशेब मांडले जातात. औंदा मुरगाचं गणित जुळतंय गड्या, म्हणत तंबाखूचे बार लावले जातात. वाळवणाची गणितं चुकली म्हणून लेकी-सुनांना बोलणं ऐकावं लागतं थोडं फार, पन पुन्हा आपण सुकाळात नसतोय ऱ्हात, ही जाणीव सगळ्यांनाच जागेवर आणून ठेवते. तंबाखूचा चोथा होईपर्यंतच नक्षत्रांचं गणित कसं, कधी नी किती वेळा बिघडलंय, नी त्या हिशेबानी झालेल्या पेरण्यांनी कित्तींदा उलटं टांगलंय, याची गोळाबेरीज होते. लायटीचा खेळ किती का वेळ चालेनात, कोणाला काय तो फरक पडत नाय. कारण हिकडं वावटळींसोबत येत ऱ्हातात त्या फक्त अशा जाणीवा. 

सिटीतल्या वावटळीनं दिलेलं ते भारावलेपण हिकडं माळावर येऊन पोचल्यावर वस्तुस्थितीला नेऊन भिडवणारं ठरतं. कदाचित सगळ्याच वावटळी या अशाचसाठी असाव्यात. भारावलेपणातनं वस्तुस्थितीपर्यंत नेऊन भिडवण्यासाठी. नाही का.

रविवार, ९ एप्रिल, २०१७

गोंधळ... सिग्नलचा... आपला



नदीपात्रातला रस्ता सोडून राजाराम पुलाकडे वळलो, की समोर सिंहगड रोडवरचा तो चौक दिसला. सिंहगड रोडने पुण्याकडे नी पुण्याकडून सिंहगडाकडे ये- जा करणारी वाहनं दिसली. सिग्नल लाल झाल्यानं पुलाच्या मध्यावर आल्यानंतर गाडी हळू केली. चौकाच्या अलिकडे येऊन थांबलो. हेडफोनवर मंद आवाजात गाणं सुरू होतं, 'तुमने जो ना कहा मैं वो सुनता गया...'

 
सिग्नल नुकताच लाल झाला होता. त्यामुळं आजूबाजूची वाहनंही हळूहळू येऊन थांबली. गाड्या थांबलेल्या पाहून चौकात भीक मागणारी उघडी मुलं या गाड्यांकडे सरकली. एकेक करत गाडीपुढे जाऊन पैसे मागू लागली. माझ्या डाव्या बाजूला एका बाईकवर एक जोडपं होतं. मागे बसलेल्या मुलीच्या पायातल्या सँडलला हात लावत भीक मागणाऱ्या त्या मुलाने पैशांसाठी हात पसरले. माझ्या उजव्या बाजूच्या कारच्या काचा तोपर्यंत वर सरकलेल्या होत्या.

हवेत जाणवण्याइतपत उकाडा असल्यानं पाठीवरची सॅक थोडी मोकळी करायचा प्रयत्न केला. मोकळ्या हवेचा अंदाज घेत- घेत गाणं ऐकत राहिलो. कारच्या आत सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज बाहेरही जाणवत होता. कारच्या डावीकडच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या हातातल्या मोबाइलवर, त्या गाण्यांच्या तालावरच बोटं चॅटिंग सुरू असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. तोपर्यंत त्या बाईकवाल्या पोरीने सँडल झटकला होता. तिच्या पुढच्या दोस्तानं दोन्ही पायांवर ती बाईक सांभाळत पाकीट काढलेलं दिसलं. पाकीटातनं सरळ दहाची नोट बाहेर आली. ती नोट त्या उघड्या पोरानं घेतली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. माझं लक्ष आहे हे जाणवताच, तो आनंद दिसू नये असा प्रयत्न करत गाडीकडे सरकला. मी आपलं गाण्याच्या ओळी गुणगुणल्या, 'तुमने जो न कहा मैं वो सुनता गया...'

या सिग्नलवरच्या वाहनांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच सिग्नल सुटायच्या आधीच गाड्या पुढे सरकल्या. मागचे हॉर्न ऐकून नाईलाजाने गाडीला स्टार्टर दिला. सिग्नल तसा नव्हताच. पुन्हा थांबलो. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा सिग्नल अजून सुरू होता. तो पिवळा होण्याची मी वाट बघत होतो. नेहमीच्या अनुभवानुसार, हा सिग्नल पिवळा झाला की राजाराम पुलाकडून पुण्याकडे वा सिंहगडाकडे जाणाऱ्या वाहनांचा सिग्नल काही सेकंदांमध्ये हिरवा होतो. त्या तयारीत मी होतो. माझ्या सिग्नलवर लक्ष होतं. सिंहगडाकडे जाण्यासाठीचा सिग्नल हिरवा झाला. गाडीचा गिअर टाकला. तोच सिंहगडाकडून पुण्याकडे जाण्यासाठी एक खासगी बस खूपच जोरात येताना दिसली. 

बसने त्या चौकातली पांढरी रेषाही ओलांडली होती. माझ्या समोरच्या दोन गाड्या त्या बसच्या अगदी टप्प्यात गेलेल्या होत्या. माझ्या गाडीचा गिअर बदलला असला, तरी दोन-चार फुटांपलीकडे मी सरकलो नव्हतो. बसच्या ड्रायव्हरने करकच्चून ब्रेक दाबला. नी त्या दोन गाडीवाल्यांना त्याचा सिग्नल दाखवत डोळे वटारले. त्याचाही सिग्नल हिरवाच होता. आमचा सिग्नल पिवळा होण्यापूर्वीच हिरवा झाला होता. चुकलं कोणीच नव्हतं. दोन्ही सिग्नल हिरवेच होते. दोन्ही रस्त्यांवरचे गाड्यांवाले नियम पाळून गाडी चालवत होते. मी दोन्हीकडचे सिग्नल बघितले. समोरच्या त्या दोन गाडीवाल्यांपैकी एका काकांनी बस ड्रायव्हरला आमचा हिरवा सिग्नल दाखवला, नी आता जाऊदे म्हणत त्याला थांबवून गाडी पुढे घेतली. त्यांच्यामागोमाग बाकीच्यांसोबत मीही निघालो. मनात म्हटलं सगळे तसे बरोबरच आहोत, सिग्नलच फक्त गोंधळलाय. गाणं अजून सुरूच होतं. 'तुमने जो ना कहा...'

सिंहगड रोडला लागण्यासाठी चौकाच्या मध्यापर्यंत येते तोच पुढच्या बाजूने एक काका रस्ता ओलांडायला आले. हात दाखवत, आपला सिग्नल बघत पुढे गेले. बाकीच्या गाड्या तो हात बघून हळू झाल्या होत्या, काही थांबल्या होत्या. एक मोठा ट्रकवाला मात्र ट्रक पुढे रेटतच होता. काकांना अगदी घासून पुढे आला. काका थबकले. हातवारे करत ओरडले. तोपर्यंत बाकीच्यांचा धीर सुटला होता, गाड्यांनी गिअर बदलले होते. त्यांच्या सर्वांच्याच लेखी सिग्नल सुटला होता. काका फक्त मागे सरकले होते. बाकीचे सगळे पुढे निघाले होते. मागे होता फक्त गोंधळ. सिग्नलचा. असे कितीतरी सिग्नल आपल्याला गोंधळात टाकतात ना. आपल्याला वाटतं आपण बरोबर, समोरच्याला वाटतं समोरचा बरोबर. दोघंही भिडतो एकमेकांना. त्यावेळचे असे गोंधळून टाकणारे सिग्नल कधी शोधत नाही ना. सिग्नल कळतच नसावेत, गोंधळ कधी कळायचे. गाणं थांबलं होतं. सिग्नलचा नी मनाचा असा गोंधळ करून.
  

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

प्ले- लिस्टचा खेळ

गाणं, संगीत तसं सगळ्यांनाच आवडतं. खूप कमी लोकं अशी असतात की ज्यांना गाणी अजिबातच आवडत नाहीत. मी अशा लोकांपैकी नक्कीच नाही. गाणी ऐकायला, जमेल तशी वाजवायला नी शेवटी त्याचा मनसोक्त आनंद घ्यायला जाम आवडतं. गाण्यांविषयी, संगीताविषयी लिहिलेलं वाचायलाही आवडतं. त्यामुळेच की काय, कंटाळवाणे प्रसंग, उदास वातावरण किंवा अगदीच निराश झाल्यानंतर गाणी ऐकणं- गुणगुणनं आवडत असावं. साधारण एक- दोन आठवड्यांपूर्वी आपण कोणती गाणी गुणगणतो या विषयीचा एक लेख वाचनात आला. तिकडे फॉरेनमध्ये त्या विषयीचं संशोधन झालं होतं म्हणे. ते आपल्याकडे झालं असतं, तर आपल्याकडेही कदाचित तसेच निष्कर्ष पुढे आले असते, असं तो लेख वाचल्यानंतर वाटलं. दिवसभरात एखादं गाणं डोक्यात बसलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण तेच गाणं मधूनच आपोआप कसं गुणगुणत बसतो, या विषयीचं ते लेखन मस्तच वाटलं. मीही अनेकदा अशीच गाणी गुणगुणत राहतो. विचार करतो, कुठं ऐकली, उत्तर सापडतं, आपल्या प्ले-लिस्टमध्ये.

मोबाईलमुळं गड्या एक भारी सोय झालीये आपल्यासारख्याची, असं उगाचंच वाटतं त्यामुळे. मोबाईलमध्ये भारंभार गाणी भरून ठेवायला मिळाल्याल्यापासून तर कुठल्याशा आरतीपासून ते एन्रिकच्या ह्रिदम डिव्हाइनपर्यंतची वेगवेगळ्या जॉनरची गाणी एकत्र ठेवाणारे अनेकजण माहितीचे झालेत. सुरुवातीला कुठल्याशा दुकानात मेमरी कार्डमध्ये शेकडो गाणी भरून देतात, हे समजलं की मोठं अप्रूप वाटायचं. घरात मोठ्याशा टेपरेकॉर्डरवर साईड ए आणि साइड बी करून एक वीसेक गाणी ऐकायला मिळायची. लयंच लय म्हणाल तर थर्टीएट नॉनस्टॉप मराठी कोळीगीतांचा तो जमाना. कॅसेट अडकलीच तर रेकॉर्डरचे खटके दाबून कॅसेट बाहेर काढणं, त्या छोट्या बारीक फिल्मचा गुंता सोडवणं, पेन वा पेन्सिलला कॅसेट अडकवून ती फिल्म पुन्हा कॅसेटमध्ये अडकवण्याची कसरत करण्याचा तो काळ. त्यावेळी मुळात मोबाईल ही चैनीची बाब. त्यात मेमरी कार्ड असणारा नी गाणी वाजवणारा मोबाईल म्हटलं की अजूनच हाय-फाय ट्रिटमेंट. त्यामुळं ते अप्रूप होतं. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आता कुणाच्याही मोबाईलमध्ये कुठुनही गाणी वाजू शकतात, डाऊनलोड होऊ शकतात अशी परिस्थिती आलीये. त्यामुळं ते अप्रूप वाटणं बंद झालंय. त्याची जागा आता सिलेक्टिव्हिटीने घेतलीये. गाणीसुद्धा आपली निवडून निवडून ऐकायची. तेवढंच बरं असतंय. डोक्याला शॉट लागला असं वाटलं, की लावायची मोबाईलवर गाणी. आपली आवडती गाणी, आपल्या प्ले-लिस्टमधून.

माझी प्ले-लिस्ट म्हटलं की खूप सारी गाणी अशी सहजच कानावर पडायला सुरुवात होते. किशोर कुमारच्या आनेवाला पल, जिंदगी आ रहा हूँ मैं सारख्या हिंदी गाण्यांपासून ते ब्रायन अॅडम्सच्या एटीन टिल आय डायपर्यंत... पंकज उधासच्या चिठ्ठी आयी है पासून ते आतिफ अस्लमच्या दूरी वा इंडियन ओशनच्या माँ रेवा तेरा पाणी निर्मळ पर्यंत... मराठी म्हणायचं तर मिलिंद इंगळेंच्या गारवापासून ते अवधूत गुप्तेंच्या फुलपाखरूपर्यंत... माऊली माऊली, झिंगाट, वेड लागलं तर आहेच नी अगदी चिन्मया सकल हृदयाही आहे... इन्स्ट्रुमेंटल म्हणायची तर झाकीर हुसैन- आनिंदो चॅटर्जींच्या तबल्यापासून ते यानीच्या अफलातून ऑर्केस्ट्रॉ रेकॉर्डिंगपर्यंतचं सगळं काही ही प्ले- लिस्ट आठवायला भाग पाडते. एक दिन बिक जायेगाची दोन्ही- तिन्ही व्हर्जन्स, केकेचं यारों..., इन्क्बाल सिनेमातलं आशायें..., बर्फीमधलं इत्तीसी हसी... गुलाल मधलं आरंभ है प्रचंड... रेहमाननं संगीत दिलेलं रुबरू नी ताल, स्ट्रिंग्सचं तितलियाँ, सदमा मधलं ए जिंदगी गले लगालें, कैलाश खेरचं अल्लाह के बंदे, अरजित सिंग- तोची रैना- रेखा भारद्वाजवालं कबिरा, अरजित सिंगचं महोब्बत बरसा देना तू... असं खास कलेक्शन ही प्ले-लिस्ट माझ्यासमोर ठेवत असते.

गाण्यांसोबत काही खास जिंगल्सही तितक्याच भारी असतात. ती हिरोच्या जाहिरातीत वापरलेली ख्वाबोंसे है इश्क इश्क, मार्केटिंगचा अफलातून फंडा सांगणारी अनबॉक्स जिंदगी अशा जिंगल्सची प्ले- लिस्ट सजवत चालल्यात. आत्ताही ती प्ले-लिस्ट आपलं काम बजावतेय. नो डिस्टर्बन्स अॅट ऑल. क्या हुआ तेरा वादा... तेरा मुझसे है पहले का नाता कोई... सारखी गाणी तर ड्रायव्हिंगची मजा वाढवणारीही ठरतात. गिटारवर वाजलेलं कॉलेज डेज, कुमार विश्वासचं कोई दिवाना कहता है..., संदीप- सलिलचं आयुष्यावर बोलू काहीचं कलेक्शन, अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम् सारखी एखादी शांत पण सुरावटींनी नटलेली प्रार्थना या प्ले-लिस्टमध्ये आहे. मी अनेकदा विचार करत राहतो, ही प्ले-लिस्ट कधीही लावा, आपल्याला ऐकाविशी का वाटत असेल. वेगवेगळ्या संगीतकारांचं हे संगीत आहे. वेगवेगळ्या भाषांमधलं ते आहे. अजय- अतुलनं तिकडं दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी दिलेलं ते इक्की की काय उच्चार असलेलं गाणंही या प्ले- लिस्टमध्ये आहे नी इंडियन ओशनवालं कंदिसाही या प्ले-लिस्टमध्ये आहे. असल्या गाण्यांचे अर्थ आपल्याला काय डोंबल्याचे समजतायेत, तरी ते भारी वाटतात, ऐकावेसे वाटतात म्हणून प्ले-लिस्टमध्ये आहेत.

अर्थपूर्ण गाण्यांपासून ते काहीही अर्थबोध न होणाऱ्या शब्दांचा समावेश असणाऱ्या गाण्यांपर्यंतचं सगळं काही ही प्ले-लिस्ट मला ऐकवत राहते. तरीही ती आवडते. आमचं सायन्स आम्हाला रेझोनन्स शिकवून गेलंय. माणसाचं मन ही एक सिस्टिम नी वाजणारं गाणं ही दुसरी एक बाहेरची सिस्टिम आपण मानली, तर माणसाला गाणं आवडणं ही प्रक्रिया रेझोनन्स म्हणून विचारात घेतली जाऊ शकते का, असा प्रश्न मला पडलाय. एखाद्या माणसाचं मन ज्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असेल, त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये वाजणारं गाणं लागलं की ते त्याला आवडत असावं का, असा प्रश्नही कधीकधी पडतो. हे सूत्र माझं मलाच लागू करून पाहिलं, तर किमान स्वतःला स्वतःच्या मनाची फ्रिक्वेन्सी तरी समजू शकेल ना? हे चूक की बरोबर ते माहिती नाही राव. बी. एस्सी. नंतर सायन्स सोडलेलं नी संगीताचं शास्र समजून न घेताच ते ऐकायला -वाजवायला घेतलेलं. त्यामुळे असले फालतू प्रश्न पडत असावेत. पण, आपल्या आवडत्या प्ले-लिस्टमधलं संगीत असा रेझोनन्स साधत असेल काय, असा प्रश्न मला अनेकदा पडलाय. कदाचित या भानगडीचं उत्तर आपल्याला आपल्या मनापर्यंत घेऊन जाऊ शकतं. मन असंही कोणाला सापडलंय का, ते आपल्याला सापडेल. पण किमान त्याची फ्रिक्वेन्सी तरी कळेल या खेळातून. आपली ही प्ले-लिस्ट आपल्याच मनाशी असा एवढा सगळा खेळ खेळत असेल, म्हणूनच ती आपल्याला आवडत असेल का ?

रविवार, १५ जानेवारी, २०१७

ऐवज

बातमीदारी सुरू असताना या वह्या, नोटबुकं, डायऱ्या तशा साठतच गेल्या. भरलेली वही परत उघडून बघायची वेळ फार कमी वेळा आली. जेव्हा केव्हा तसा प्रसंग आलाच, तेव्हा आपलं तेवढ्यापुरतं तेवढं थांबून काम आवरतं घेत होतो. रविवारचा निवांतपणा असल्यानं  आज या वह्या, नोटबुकं, डायऱ्यांकडं जरा शांतपणे पाहता आलं. साधारण सहा वर्षांच्या भटकेपणातली अनेक गुपितं या डायऱ्यांमधून नोंदवलेली सापडली. बातमीदारीच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या त्या नोंदी चाळताना त्या त्या वेळचे संदर्भ उगाचच तपासून पाहायला लागलो. काय
लिहिलंय, कसं लिहिलंय, त्या वेळी घाई-गडबडीत नोंदवलं असेल का ते वहीत, की फोनवर बोलून ते लिहिलेलं असावं, की प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर बसून लिहिलेलं असावं, वगैरे वगैरे. त्या त्या कार्यक्रमांच्या, ठिकाणांच्या, व्यक्तींविषयीच्या, काही छापण्यासाठीच्या, काही न छापण्यासाठीच्या अशा सगळ्याच त्या नोंदींमुळे दुपार कधी संपून गेली तेच समजलं नाही. लक्षात आलं या वह्या- डायऱ्या म्हणजे निव्वळ नोंदी नाहीत, ऐवजच आहे. तसंही बातमीदारांकडे दुसरं असतं तरी काय. या अशा नोंदी नी जोडलेली माणसं, हाच काय तो ठेवा. म्हटलं तर काहीच नाही, नी म्हटलं तर सारं काही.

विद्यार्थीदशेमधून बातमीदारीकडे प्रवास करतानाचा काळ आठवत बसलो. कॉलेजमध्ये असताना लिहायला वह्या नी रजिस्टरंच. पुठ्ठ्याच्या वह्या, फ्लेक्जिबल रजिस्टरं... छोट्या वह्या हाताळायला सोयीस्कर, रजिस्टरांमध्ये लिहायला भरपूर जागा. शाळेमधून कॉलेजला गेलो ते वह्यांमधून रजिस्टरांकडे असा प्रवास करून. कॉलेज पूर्ण करून बातमीदारीकडे वळू लागलो, तसा एक असाच हवाहवासा बदल करावासा वाटे. रजिस्टरांकडून छानशा दिसणाऱ्या डायऱ्यांपर्यंतचा तो बदल असे. दोन- तिनदा प्रयत्नही करून पाहिला, पण प्रत्यक्षात तसा बदल नंतर कधी केला नाही. त्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी लवकरच समजल्या. त्या ऐवजी फिल्डवर असताना अगदी फ्लेक्सिजबल, वेळप्रसंगी खिशात बसेल, नाहीतर फारतर पाठीमागे कमरेभोवतीच्या पट्ट्यामध्ये सहज अडकवता येईल, किंवा गाडीच्या हेडलाईटजवळच्या जागेत अडकतील अशा वह्या वा डायऱ्या हातात खेळू लागल्या. बड्या बातमीदारांचे, त्यांच्या स्टाइलचे काही किस्सेही ऐकायला मिळालेले होते. कोणी काहीही न टिपून घेताही कशी हेडलाइन लिहून जायचे, अगदी बसच्या तिकिटाएवढ्याच जागेत कोणी महत्त्वाची बातमी कशी टिपून घ्यायचे, कोणाचं अक्षर किती भयंकर तरी बातमी किती भारी असले ते किस्से असत. असलं काही ऐकल्यावर आपल्यालाही डेरिंग करू वाटे, पण पुन्हा आपल्याच डायरीवर विश्वास ठेवायच्या सवयीमुळं पेन आपसूकचं हातात धरला जाई. तळहातावर दोन बसतील अशा छोट्या डायऱ्यांपासून ते मग लेटरपॅडच्या आकारापर्यंतच्या या डायऱ्या आता माझ्याकडच्या ऐवजात ठळकपणे दिसतायेत. कॉलमांचं गणित अनुभवायला मिळाल्यानं, लिहितानाही दोन कॉलमात पानं लिहियाची सवय जडली नसती, तरच काय ते नवल होतं. या डायऱ्या नी वह्यांमध्ये एका पानावर दोन कॉलमात लिहिलेला मॅटर दिसतोय. नेहमीच्या प्लॅनिंगसाठी वापरलेल्या दोन-चार मोठ्या डायऱ्या आणि इतर पाच-पन्नास वह्या असलेला हा ऐवज हॉलमधल्या बॉक्समध्ये अलगदच बसला.

वह्यांमध्ये लिहिताना नोंदवून घेतलेले मोबाईल वा टेलिफोन नंबर, ते लगेच लक्षात यावेत म्हणून मुद्दाम समासामध्ये लिहायची लावलेली सवय, फोन नंबरच्या यादीत असे नंबर नोंदवलं की त्या नंबरवर बरोबरची खूण करून, त्या त्या डायरीच्या कव्हरवर 'कॉन्टॅक्ट्स अपडेटेड'चा मारलेला शेरा असं सारं काही दिसायला लागलं. या नंबरांच्याच जोडीने पुढे आलेली व्हिजिटिंग कार्ड्सही आपसूकच आठवली. या ऐवजामध्ये दोन मोठ्ठ्या व्हिजिटिंग कार्ड होल्डर्सचीही भर पडली. टस्किगी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, ब्रिटिश कौन्सिलवाली मंडळी, काही बडे वैज्ञानिक, विद्यापीठांचे कुलगुरू, कंपन्यांचे सीईओ, मंदिराचे पुजारी, कुठले कुठले एजंट, नवउद्योजक, 'समाजसेवक' असं कार्डवर लिहिलेले राजकारणी अशा सगळ्याच प्रकारच्या व्यक्तींची ही कार्ड तो तो माणूस आठवायला भाग पाडत होती. ही कार्ड नेमकी कधी घेतली, कोणत्या कार्यक्रमांमध्ये आपण यांना भेटलो असू वगैरेचाही विचार झाला. आठवून भारी वाटलं. त्यांच्यासोबत झालेल्या गप्पा, त्या संदर्भाने डायऱ्यांमध्ये सापडलेल्या काही नोंदी आणि त्या अनुषंगानेच त्या त्या वेळी लिहिलेल्या बातम्याही आठवल्या. डायऱ्यांवर लिहिलेल्या तारखा नी ही व्हिजिटिंग कार्ड होल्डर्स भूतकाळामध्ये नेण्याच्या ताकदीची आहेत हे लक्षात आलं. बॉक्स भरल्यावर त्याच्यावर झाकण टाकलं. कुशन बसवून पुन्हा पूर्वीसारखा केला. व्यवस्थित लावण्यासाठी म्हणून तो ढकलायचा प्रयत्न केला. त्याचं वजन सहजच जाणवलं. आपलं आपल्यालाच पुन्हा समाधान. आपला ऐवज वजनदार आहे, बर कां. उगा काय केलं पाच वर्षात म्हणायला नको कोणी. म्हटलंच तर आता 'हा बॉक्स दाखवून, थोडं ढकलून बघा.' म्हणायचं. कल्पनेनेच हसायला आलं.

पंढरपूरची वारी, मुंबईतली सायन्स काँग्रेस, विद्यापीठातले 'आविष्कार', सिनेट नी मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठका, 'एनडीए'च्या पीओपी, थर्टी फर्स्टच्या रात्री, शाळांचे पहिले दिवस, कोणाकोणावरचे भानगडींचे आरोप, विद्यार्थी संघटनांची आंदोलनं, मागच्या महापालिका निवडणुका असलं लयं काय-बाय पुन्हा एकदा आठवायला मिळालं. असाइन्मेंटच्या निमित्ताने पुण्याबाहेर गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या वेगळ्या नोंदीही पाहायला मिळाल्या. बरं वाटलं. बातमीदारीचा हा ऐवज फुकटात फ्लॅशबॅकचा सिनेमा दाखवणारा ठेवा ठरतोय. जाम आवडला आपल्याला. शेवटी मनातल्या मनात स्वतःच स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेतली. ऐवज गोळा करून ठेवण्याची एक चांगली सवय लावल्याबद्दल. सेव्हिंगच ते. एका वेगळ्या अर्थानं. आठवणी जतन करून ठेवणारं.